ओटीपी सेवा कार्यान्वित, कामास गती
बेळगाव : ओटीपी सेवा सुरू झाल्याने शासकीय कागदपत्रे आता झटपट मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची होणारी धावपळदेखील कमी होणार आहे. विशेषत: जात-उत्पन्नाचा दाखला काही तासात उपलब्ध होणार आहे. महसूल खात्याकडून प्रत्येक कुटुंबाचे ओटीपी (वन टाईम पासवर्ड) तयार करण्यात आले आहेत. शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांना 10 ते 15 दिवसांची वाट पहावी लागते. मात्र आता ओटीपीमुळे जलदगतीने कागदपत्रे हाती मिळणार आहेत. सर्व नेम्मदी केंद्रांवर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. दरम्यान तलाठी-सर्कलची सही आणि शिक्कासुद्धा बंधनकारक होता. या प्रक्रियेसाठी 5 ते 6 दिवस धडपड करावी लागत होती. शिवाय कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 21 दिवसांनंतर जात उत्पन्नाचा दाखला मिळत होता. मात्र आता ओटीपीचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय शासकीय कामासाठी प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे जात-उत्पन्नाचा दाखला काहीक्षणात सर्वसामान्यांच्या हाती पडणार आहे. शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उचगाव, काकती, सांबरा, गोवावेस या ठिकाणी नेम्मदी केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांतून जात-उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल, विधवा पेन्शन, वृद्धाप पेन्शन आणि इतर सुविधा दिल्या जातात. मात्र आता ओटीपीमुळे जात-उत्पन्नाचा दाखला लवकर मिळणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार आहेत. सरकारी नोकरीत आरक्षण, शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी जात-उत्पन्नाचा दाखला मिळविणे सोपे झाले आहे. कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आली आहे. दरम्यान या माहितीच्या आधारेच प्रमाणपत्र मंजूर करून काही वेळातच प्रिंट काढली जाणार आहे.