कवयित्री प्राचार्या डॉ. शोभा नाईक : आरपीडी कॉलेजमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा
प्रतिनिधी / बेळगाव
प्राचार्या डॉ. शोभा नाईक लिखित ‘अधल्या मधल्या ओळी’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी एसकेई सोसायटीच्या आरपीडी कॉलेजमध्ये पार पडला. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, कोल्हापूर येथील लेखिका सोनाली नवांगुळ, ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी, पुरोगामी व्यासपीठाचे अध्यक्ष कृष्णा मेणसे, लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला.
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सोनाली नवांगुळ म्हणाल्या, कविता ही आंतरमनाचा ठाव तर विचारांना धार आणणारी असते. डॉ. शोभा नाईक यांनी स्त्रियांच्या मनाची अवस्था आपल्या शब्दांमधून मांडली आहे. स्त्रियांना अधिकार तर आहेत, परंतु पुरुषच ते गाजवत असतात, हे कवितेतून स्पष्ट होते. मराठी भाषेची चाललेली गळचेपी त्यांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडून मराठीपण कसे हरवत चालले आहे हे समाजाला दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष किरण ठाकुर यांनी ‘अधल्या मधल्या ओळी’ या कविता संग्रहाचे कौतुक करत मराठीला कसे नख लावले जात आहे हे कवितेतून सुंदर मांडल्याचे सांगितले. प्रत्येकाच्या मनात एक कवी दडलेला असतो. समाजातील चांगल्या-वाईट घटनांमधून कविता फुलत जाते, असे सांगून त्यांनी आरपीडी महाविद्यालयात अनेक साहित्यिक घडल्याचे सांगितले. पु. ल. देशपांडे, प्राचार्य अरविंद याळगी, अनंत मनोहर, महाजन, मधुसूदन गोखले, फडके यासारख्या साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
विठ्ठलराव याळगी यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांच्यासमोर दिल्ली येथे सादर केलेली आपली छोटी कविता सादर केली. कृष्णा मेणसे यांनी आरपीडी कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. शोभा नाईक यांनी पुस्तक प्रकाशनाचा उद्देश स्पष्ट केला. मेधा मराठे यांनी कवितांचे अभिवाचन केले. श्रेया सव्वाशेरी हिने ईशस्तवन तर मराठी विभागप्रमुख पी. डी. गावडे यांनी परिचय करून दिला.