क्वाड अंतर्गत सहकार्य वाढविण्याचा उद्देश ः मार्च महिना ठरणार कूटनीतिसाठी महत्त्वपूर्ण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात मार्च महिना हा कूटनीतिच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एकीकडे भारत जी-20 परिषदेचे आयोजन करणार असून दुसरीकडे क्वाड देशांच्या विदेश मंत्र्यांची 3 मार्च रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. विदेशमंत्री एस. जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या विदेशमंत्री पेनी वांग, जपानचे विदेशमंत्री योशीमाशा हायाशी आणि अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांच्यादरम्यान 3 मार्च रोजी बैठक होणार आहे.
क्वाड देशांचे सदस्य असणाऱया 3 देशांचे विदेशमंत्री 1 आणि 2 मार्च रोजी दिल्लीत जी-20 परिषदेत सामील होणार आहेत. या परिषदेत रशिया आणि चीनचे विदेशमंत्री देखील सहभागी होतील. यानंतर अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन, जपानचे विदेशमंत्री हायाशी आणि ऑस्ट्रेलियाच्या विदेशमंत्री पेनी वांग 3 मार्च रोजी होणाऱया बैठकीत सामील होतील.
आगामी क्वाड शिखर परिषदेत मे महिन्यात आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच याचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळण्ण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत क्वाड शिखर परिषदेच्या अजेंडय़ाला अंतिम स्वरुप देण्यासाठी विदेशमंत्र्यांची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. 2-4 मार्चदरम्यान नवी दिल्लीत रायसीना डायलॉगचे देखील आयोजन होणार आहे.
जी-20 ची बैठक
दिल्लीत पुढील महिन्यात 1-2 मार्चपर्यंत जी-20 परिषद आयोजित होणार आहे. यात जी-20 च्या विदेश मंत्र्यांदरम्यान चर्चा होईल. या परिषदेत भारताकडून विशेष स्वरुपात आमंत्रित काही देशांचे विदेशमंत्रीही उपस्थित राहणरा आहेत. भारत जी-20 देशांच्या बैठकीचे यजमानपद पहिल्यांदाच भूषवत आहे. तर सप्टेंबरमध्ये जी-20 च्या प्रमुखांच्या बैठकीपूर्वी आणखी एकदा विदेशमंत्री एकत्र येणार आहेत.
देशांचे प्रमुख दौऱयावर
मार्च महिन्यात जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ज पहिल्यांदाच भारताच्या दौऱयावर असणार आहेत. जर्मनी भारतासोबत आर्थिक तसेच संरक्षणक्षेत्रात सहकार्य वाढवू पाहत आहे. याकरता त्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जिओगिआ मेलोनी दौऱयावर येणार आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. मग ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतात दाखल होणार आहेत. ऑस्ट्रेलियासोबत भारताची वाढती भागिदारी पाहता हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.