ऑनलाईन टीम / पुणे :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्याविरोधात सांगलीतील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट (non bailable warrant) काढलं आहे. 2008 मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आलं आहे.
मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी राज्यात दुकानांवरील पाट्या या मराठीत असाव्यात, अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यासाठी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी मनसैनिकांनी आक्रमक आंदोलनेही केली होती. सांगलीतही मराठी पाट्यांच्या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी दुकाने बळजबरी बंद करण्याचा प्रयत्न केला होता. दगफेकही करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्ते व राज ठाकरेंविरोधात भारतीय दंड विधान 109,117,143 आणि मुंबई पोलीस कायदा 135 नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांना अनेकदा कोर्टात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने पाच ते दहा वर्षांपूर्वीची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचे आदेश कोर्टांना दिले आहेत. त्यानुसार हे प्रकरण निकाली काढण्यासाठी राज ठाकरेंविरोधात कोर्टाने 6 एप्रिलला अजामीनपात्र वॉरंट काढलं. मात्र, एक महिना उलटला तरीही पोलिसांनी राज ठाकरेंवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे शिराळा कोर्टाने म्हटले आहे.