ऑनलाईन टीम/तरुण भारत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (reserve bank of india) महिनाभराच्या अंतराने दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये (repo rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikana Das) यांनी पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर ही घोषणा केली. रेपो रेटमध्ये आरबीआयने ०.५० टक्क्यांची वाढ केल्याने आता रेपो रेट ४.४० टक्क्यांवरून ४.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. एमपीसी म्हणजेच पतधोरण निर्धारण समितीच्या सहा सदस्यांनी रेपो रेट वाढण्याच्या बाजून मतदान केलं. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जांच्या हप्त्यात वाढ होणार आहे.
रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) सोमवारपासून तीन दिवसांची बैठक झाली. बैठकीनंतर बुधवारी रेपो रेट जाहीर करणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले होते. तीन दिवसांची बैठक झाल्यानंतर आज गव्हर्नर दास यांनी रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याच्या निर्णयाची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये ४० बिंदूंची वाढ केली जाईल, अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेने ५० बिंदूंची म्हणजे ०.५० टक्क्यांची वाढ केलीये.
पतधोरण जाहीर करत असताना गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईच्या मुद्द्यावर भाष्य केलं. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे पुरवठा साखळी बिघडली आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे भारत दररोज आव्हानांचा सामना करत आहे. यामुळे जगभरात महागाई वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं.