अनेकांना अपस्मार किंवा एपिलप्सीचा आजार असतो. अशा लोकांना केव्हाही बेशुद्धावस्था प्राप्त होऊ शकते किंवा त्यांची दातखीळ बसते. वेडाचा झटकाही येऊ शकतो. अशा लोकांचे जीवन अत्यंत दुर्धर असून त्यांचे विवाह होणे जवळजवळ अशक्य असते. मात्र, अशा रुग्णांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली आयआयटीच्या वैज्ञानिकांनी एक तंत्रज्ञान विकसित केले असून त्यामुळे एपिलप्सीचा विकार नियंत्रणाखाली येणार आहे.
दिल्ली आयआयटीच्या संशोधकांनी इन्व्हेझिव्ह ईईजी बेस्ड ब्रेन सोर्स लोकलायझेशन टेक्निक नामक एक प्रणाली विकसित केली असून तिची परीक्षणे यशस्वी ठरली आहेत. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मेंदूतील एपिलप्सीचे नेमके केंद्र शोधता येते. त्यामुळे मेंदूच्या त्या नेमक्मया भागावर शस्त्रक्रिया करून हा विकार नियंत्रणाखाली ठेवता येतो किंवा तो पूर्णपणे बराही करता येतो. या तंत्रज्ञान विकासामुळे डॉक्टर्सही अत्यंत उत्साहीत झाले असून लवकरात लवकर ते उपलब्ध व्हावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
देशात सध्या 20 लाखांहून अधिक एपिलप्सीचे रुग्ण आहेत. एपिलप्सीचा झटका आल्यानंतर कित्येकदा रुग्णांचे मूत्राशय आणि आतडय़ांवरील नियंत्रण सुटते. त्यामुळे देहधर्मावर नियंत्रण राहात नाही. सार्वजनिक ठिकाणी असा झटका आल्यास अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या विकाराचे रुग्ण घराबाहेर पडण्यासही घाबरतात. हे तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध झाल्यानंतर अशा रुग्णांचे बरेचसे त्रास वाचणार असून हे तंत्रज्ञान किफायतशीर दरात उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.