उद्योगखात्रीतून पर्यावरणपूरक विकास : डोंगर भागात हिरवाई
प्रतिनिधी /बेळगाव
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योगखात्री योजनेंतर्गत तलाव, गटारी आणि रस्त्यांचा विकास साधला जात आहे. त्याबरोबर पर्यावरण संरक्षणाला मोठा हातभार लागत आहे. संपूर्ण पर्यावरणात हिरवाई फुलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डेंगर आणि इतर पडिक जमिनीतदेखील रोपे लावून परिसर हिरवाईने फुलविला जाणार आहे. अशी प्रतिकृती जिल्हा पंचायत कार्यालयात साकारण्यात आली आहे.
कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर ही प्रतिकृती साकारण्यात आल्यामुळे येथून ये-जा करणारे नागरिक याकडे आकर्षित होत आहेत. उद्योगखात्री योजनेतून डोंगर, शेत-शिवार व इतर ठिकाणी तलावांची निर्मिती केली जात आहे. शिवाय सर्वत्र रोप लागवड करून परिसर हिरवागार केला जाणार आहे. त्यामुळे उद्योगखात्री योजना पर्यावरणाचे समतोल राखण्यात मोठे काम करीत आहे. या योजनेमुळे अनेक गावातील परिसर हिरवाईने नटू लागल्याचा प्रत्यय कार्यालयात साकारण्यात आलेल्या प्रतिकृतीतून येत आहे.
उद्योगखात्री योजनेतून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी डोंगर भागात तलावांची निर्मिती केली जात आहे. त्याबरोबर ठिकठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारा घातला जात आहे. एकूणच ग्रामीण भागात जलसंजीवनी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पडिक आणि नापीक क्षेत्रातदेखील खोदकाम करून पाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय डोंगर परिसर आणि इतर खुल्या जागेतदेखील झाडांची संख्या वाढविण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वत्र हिरवाई फुलणार आहे.