दोघा तरुणांना शनिवारी सायंकाळी दर्शन ः परिसरात भीतीचे वातावरण
वार्ताहर / किणये
गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी बेळवट्टी-बीजगर्णी परिसरात शेतकऱयांना बिबटय़ाचे दर्शन झाले होते. दोन्ही गावातील मिळून चौघांना बिबटय़ा दिसला होता. याची माहिती वन खात्याच्या अधिकाऱयांना देण्यात आली. मात्र वन खात्याच्या अधिकाऱयांनी म्हणावे तसे बिबटय़ाला पकडण्यासाठी प्रयत्न केले नसल्याच्या तक्रारी या भागातील शेतकरी वर्गातून होत आहेत. या परिसरातील शेतकरी भीतीच्या छायेखाली असतानाच शनिवारी सायंकाळी इनाम बडस- बाकनूर क्रॉसजवळ दोघा तरुणांना बिबटय़ा दिसल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
शनिवारी सायंकाळी या परिसरात उसाच्या पिकातून बिबटय़ा बाहेर पळून दुसऱया शेतात जात असताना दोघा तरुणांनी बिबटय़ाला पाहिले असल्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे. सुशांत हाजगोळकर व मित्र दीपक हे दोघेही बेळवटी गावाकडे शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान जात होते. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या उसाच्या पिकातून एक बिबटय़ा बाहेर आला आणि तो तिथून पळून दुसऱया उसाच्या पिकात गेला. त्या बिबटय़ाला पाहताच आम्ही दोघेही भयभीत झालो, अशी माहिती सुशांत हाजगोळकर यांनी दिली.
यापूर्वी दिनांक 14 ऑगस्ट रोजी बेळवटी गावातील कट्टेमाळ शिवारात भात पिकात युरिया खताची फवारणी करीत असताना शिवाजी नलावडे यांना बिबटय़ा दिसला होता .त्यानंतर बिजगर्णी गावाजवळील इंदिरानगर शेतवाडीमध्ये सोमनाथ बेळगावकर यांना 20 ऑगस्ट रोजी बिबटय़ा दिसला होता. सोमनाथ हे गवत आणण्यासाठी गेले होते त्यानंतर बेळवट्टीr आणि बीजगर्णी भागात वन खात्याच्या अधिकाऱयांनी पाहणी केली.
यावेळी वन खात्याच्या अधिकाऱयांना पायाचे ठसे सापडले. मात्र पाऊस आला असल्यामुळे हे या ठशांची तपासणी योग्य प्रकारे झाली नसल्याची माहिती सदर अधिकाऱयांनी दिली. या परिसरात वन खात्याच्या अधिकाऱयांनी म्हणावी तशी पाहणी केली नसल्याच्या तक्रारी परिसरातील शेतकरी वर्ग व बीजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी केली आहे.