प्रतिनिधी/कुर्डुवाडी
कुर्डुवाडी पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयित रोपी नेवासे येथून अटक करुन आणल्यानंतर लघुशंकेचे कारण देत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस ठाण्याच्या आवारातून भिंतीवरून उडी मारुन पळाला.ही घटना गुरुवार दि.९ रोजी दु. २ वा. सुमारास घडली. राहुल मरगळ माळी (वय.२५ रा.नेवासे) असे या पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सदर संशयीत आरोपी राहुल मरगळ माळी व इतर दोघे दशरथ मरगळ माळी व दत्ता मरगळ माळी हे आपल्या कुटुंबासह कुर्डू (ता. माढा) येथील फिर्यादी तुकाराम विष्णू पायगण यांच्या शेतात गेल्या दहा महिन्यापासून आठवडा पगारीवर कामाला होते. शेतातील खोल्यांध्ये त्यांची राहण्याची सोय केली होती. रविवार दि. ५ जून रोजी वरील सर्व आरोपी पायगण यांचा शेतातील शेती अवजारांसह पायगण यांचा टमटम (एम एच ४५ टी २२७९) असा एकूण ३ लाखांचे साहित्य घेऊन पळून गेले होते.
याबाबत पायगण यांनी दि. ६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर संशयीत आरोपींना त्यांच्या पत्त्यावरुन नेवासे येथून अटक करुन कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आणले होते. दरम्यान आज दुपारी २ वा. अटक केलेल्या संशयीत आरोपीमधील राहुल मरगळ याने लघुशंकेचे कारण सांगून पोलिसांच्या हाती तुरी देऊन भिंतीवरून उडी मारून पळून गेला. दिवसा ढवळ्या पोलिसांच्या हातून संशयीत आरोपी पळून गेल्याने पोलिसांची नाचक्की झाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी सदर आरोपीचा फोटो सर्व समाजमाध्यमावर टाकून तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेवरुन सदर आरोपी बद्दल माहिती प्रसारित करुन सदर आरोपीचा शोध घेत आहेत.