पंतप्रधान मोदी यांचा पुतिन यांना आग्रह
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युक्रेनचा प्रश्न सोडविण्याचा एकमेव मार्ग चर्चा हाच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांची शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. युक्रेनचे युद्ध गेले चार महिने सुरू आहे. त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. हे युद्ध त्वरित थांबण्याची आवश्यकता असून त्यासाठी सामोपचाराने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावर पुतिन यांची प्रतिक्रिया त्वरित समजू शकली नाही.
युक्रेनचा प्रश्न युद्धाने सुटणार नाही. त्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांशी खुल्या मनाने चर्चा केली पाहिजे. युद्धावर भर दिल्यास केवळ जगाची हानीच होईल, ही भारताची प्रारंभापासूनची भूमिका आहे. याची कल्पना रशियालाही आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी भारताने प्रयत्न करावेत, अशी युरोपियन देशांची इच्छा आहे. तथापि, अद्याप भारताने अलिप्त राहणे योग्य मानले आहे.
ऊर्जाविषयक चर्चा पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदींनी द्विपक्षीय संबंध आणि व्यापाराविषयीही चर्चा केली. त्याचप्रमाणे ऊर्जास्रोतांचा मुद्दा उपस्थित केला. युक्रेन युद्धामुळे जगाच्या अन्नपुरवठा साखळय़ा तुटल्या आहेत. त्या सुरळीत होण्याची आवश्यकता आहे. अन्नपुरवठा साखळय़ा तुटल्याने जगावर महागाईचे संकट कोसळले असून भारताचा त्याला अपवाद नाही. त्यामुळे पुतिन यांनी पुढाकार घेऊन चर्चा सुरू करावी, असे भारताचे प्रारंभापासून म्हणणे आहे.