पिंपळगाव/वार्ताहर
शेतातील ऊस पिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची गरज असतांना व पिके शेतांत वाळत असतांना चिकोत्रा धरणातून जे पाणी सोडले जाते ते पाणी शेतीसाठी वापरण्यास नदी काठच्या शेतकऱ्यांवर पाटबंधारे खात्याच्यावतीने चुकीच्या पद्धतीने उपसाबंदी लादल्याच्या निषेधार्थ व सदरची उपसाबंदी तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी मंगळवारी पिंपळगाव(ता.भुदरगड)येथे सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यामुळे गारगोटी -उत्तुर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी सदरची उपसाबंदी तात्काळ मागे घेत असल्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिल्याने रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार म्हणाले.चार वर्षांपूर्वी कमी पावसामुळे धरण ज्यावेळी साठ टक्के इतके भरत होते त्यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारीवर्गाच्या योग्य नियोजनामुळे उपसाबंदीची गरज लागत नव्हती. पण या चार वर्षांत धरण शंभर टक्के भरूनही पाटबंधारेच्या चुकीच्या व गलतान नियोजनामुळे शेतकऱ्यांवर उपसाबंदी लादली जात आहे. धरण भरले की मार्च महिन्यापर्यंत भरमसाठ पाणी सोडत राहायचे व ऐन उन्हाळ्यात ऊस पिकांना पाण्याची गरज असताना उपसाबंदी करायची असा विचित्र व मनमानी कारभार सुरू असल्याने शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला असून आज हे आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले,पूर्वी चिकोत्रा धरणांतील पाणी वर्षभर पुरविण्यासाठी नियोजन करावे लागायचे पण आता शेजारचे नागणवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातील पाणी लाभक्षेत्रात सोडले जात असताना चिकोत्रा धरणातील पाण्यावर उपसाबंदी कशासाठी करावी लागते हा संशोधनाचा विषय आहे.पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांवर कोणाचा वचक नसल्याने शेतकऱ्यांवर अशाप्रकारे अन्याय सुरू असून असे प्रकार शिवसेना कदापिही सहन करणार नाही. भाजपचे योगेशराव परुळेकर म्हणाले,जर अन्यायी पध्दतीने लादलेली ही उपसाबंदी तात्काळ मागे घेतली नाही तर शेतकरी यापुढे पाणीपट्टी व वीज बिल भरणार नाहीत याची नोंद घ्यावी.१ ते १८नंबरच्या बंधाऱ्यापर्यंत वर्षभर नियमितपणे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात यावे .
यावेळी भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती जगदीश पाटील,शिवसेना(उध्दव ठाकरे गट)तालुकाप्रमुख अविनाश शिंदे,उपतालुकाप्रमुख अशोकराव पाटील ,शाखाप्रमुख अंकुश पाटील ,माजी सरपंच बाळासो खतकर, मारुती भादवणकर,नारायण शेवाळे ,सचिन पाटील ,जयवंत कुदळे,रमेश पाटील ,विष्णू कुंभार ,पांडुरंग भाकरे ,कुंडलिक शिंत्रे ,आप्पासो तोरस्कर ,बाबुराव राऊत,विजय पाटील तसेच पाटबंधारे विभागाचे व वीज वितरचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकरी यांच्यात मोठी शाब्दिक चकमक झाली.यापुढे पुन्हा अशाप्रकारे अन्यायी उपसाबंदी लादल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा शेतकरी वर्गातून यावेळी देण्यात आला.भुदरगड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांची समजून काढून सर्वाना शांत केले.वीज वितरणच्या कर्मचारीवर्गासही शेतकऱ्यांनी धारेवर धरले.तसेच चिकोत्रा नदीवरील १ ते १८ नंबरच्या बंधाऱ्याना ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती असून ही गळती काढण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षी काही ठिकाणी चक्क वाकळेच्या कापडाचे बोळे घालून व त्यावर सिमेंट लावून लाखो रुपये खर्च दाखविण्यात आला असल्याचा आरोप यावेळी लोकप्रतिनिधीनी केला.