विजय सरदेसाई यांची मागणी, केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
प्रतिनिधी/ पणजी
मार्च 2021 मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदाच्या भरती मेळाव्यात महाघोटाळा झालेला आहे. याबाबत गोवा सरकारला व्हिडिओ फुटेजद्वारे माहिती देऊनही जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस महानिरीक्षकांकडूनही कारवाईबाबत दखल घेतली जात नाही. गोवा विधानसभा अधिवेशनातही मुख्यमंत्री हा विषय येऊ नये म्हणून अधिवेशनाचा कालावधी कमी करतात. यावरूनच 2021 मधील पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचे सिद्ध होत असून, या भरती प्रक्रियेत घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
विजय सरदेसाई यांनी सांगितले की, मार्च 2021 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबविली जात असताना जे उमेदवार शारीरिक चाचणीत अपात्र ठरले त्यांना पात्र ठरविण्यात आले आहे, तर पात्र उमेदवारांना अपात्र ठरवले आहे. ह्याही पुढे जाऊन भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी पोलीस शिपाई या पदासाठी घेण्यात आलेल्या शारीरिक क्षमता चाचणीत जे उमेदवार अपात्र ठरले त्या उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षकपदाच्या चाचणी परीक्षेत 90 हून अधिक गुण देऊन पात्र ठरविण्यात आले आहेत.
चौकशी समितीचा अहवाल कुठे?
या सर्व गैरव्यवहारांचे व्हिडिओ फुटेज समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली पोलीस उपअधीक्षक यांच्याद्वारे चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीच्या अहवालात एकूण 8 उमेदवार अपात्र ठरूनही त्यांना पात्र ठरविल्याचे उघड झाले आहे. तरीही या चौकशी समितीने सप्टेंबर 2022 मध्ये अहवाल देऊनही या अहवालाची प्रत किंवा संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रश्न विचारल्यावर माहितीही दिली जात नाही. हा घोटाळा मोठा असून, या भरती प्रक्रियेसाठी सरकारने 70 लाख ऊपये खर्च केले आहेत.
घोटाळे केलेले उमेदवारच पोलीस?
भविष्यात असे जर चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रशासनात घोटाळे केलेले उमेदवारच सहभागी झाले तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? हाही प्रश्न उपस्थित होतो. म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या दबावाला पोलिस प्रशासनाने बळी न पडता घोटाळाबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी पुन्हा केली आहे.