नागरिकांकडून चोप : जिल्हाधिकाऱयांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
मंगळवारी मळेकरणी देवीच्या यात्रेमध्ये प्रसादासाठी आलेल्या भक्त मंडळांनी दारूच्या नशेत नंगानाच करून काही महिलांवर हात टाकला. त्यामुळे महिलांनी आरडाओरड करताच तळीरामांना नागरिकांनी चांगलेच चोपून काढले. यात्रेला येणाऱया भक्त मंडळींची दिवसेंदिवस वाढती गर्दी पाहता उचगावमधील नागरिकांचे जगणे मुश्कील झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून केल्या जात आहेत. या यात्रेवर जिल्हाधिकाऱयांनी तातडीने बंधने घालावीत, अशी मागणी होत आहे.
महिलांनी व नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मळेकरणी देवीच्या यात्रेसाठी भाविक भक्तांची अलोट गर्दी लोटली होती. मंदिरापासून एक किलोमीटर परिसरात अमराई आहेत. या आमराईत अनेक नागरिक वास्तव्य करून राहतात. यात्रेमध्ये मांसाहारी जेवणावळी असल्याने येणाऱया सर्रास नागरिकांतून मध्यपान करणाऱयांची संख्याही दुपटीने वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. आमराईतील मिळेल त्या झाडाखाली बसून मद्यपान करण्याची तळीरामांची संख्या कमी नाही.
मद्यपान केलेल्या, नशेत असणाऱया काही गुंड प्रवृत्तीच्या मंडळांकडून मंगळवारी जवळपासच्या घरांतील महिलांवर बळजबरी केल्याचा प्रकार घडल्याने नागरिकांनी या तळीरामांची चांगलीच धुलाई केली. नंतर तळीरामांनी तेथून काढता पाय घेतला. यात्रेनिमित्त उचगावमध्ये आलेल्या या भक्त मंडळींकडून उचगावातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
या मंदिराच्या बाजूला असलेल्या शेतवडीमध्ये मद्यपान करणारे मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. मद्यपानानंतर बाटल्या, इतर केरकचरा तेथेच अस्ताव्यस्त टाकून जातात. नशेमध्ये बाटल्या फोडण्याचे प्रकारही ते करत असल्याने शेतकऱयांना मोठा धोका निर्माण झाला आहे. आमराईतून वास्तव्य करून असणाऱया घरांतील एकाकी महिलांच्या बाबतीत असे प्रकार घडत आहेत.
पोलीस खाते, जिल्हाधिकारी यांनी तातडीने याची दखल घेणे गरजेचे आहे. उचगाव ऍप्रोच रोड, कोवाड रोड, मळेकरणीकडे जाणारा रोड तसेच बसस्थानक हा संपूर्ण भाग ट्रफिक जाम होत असल्याने उचगावमध्ये ये-जा करणाऱया नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे.
गावच्या बसस्थानक परिसरात कर्नाटक ग्रामीण विकास बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, पतसंस्था, प्राथमिक-माध्यमिक शाळा आहेत. यात्रेला येणाऱया नागरिकांच्या प्रचंड लोंढय़ामुळे येथील जनजीवन विस्कळीत होत आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. या यात्रेवर बंधने घालावीत, अशी मागणी उचगावमधील नागरिकांनी केली आहे. मद्यपान करणाऱया नागरिकांवर कायदेशीर इलाज करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.