ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोरोनानंतर शिक्षणाचा दर्जा ढासळला आहे. विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकच त्यांच्या विषयात पारंगत नसल्याचे मराठवाड्यातील सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे यापुढे शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंदेकर यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
केंदेकर म्हणाले, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात आम्ही शिक्षणाचा स्तर तपासला. पहिली ते दहावी पर्यंतच्या वर्गात वेगवेगळय़ा विषयांवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी आठवीच्या 45 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नव्हता. आठही जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती होती. कोरोनाकाळात शाळा बंद होत्या आणि ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांवर विशेष परिणाम झाला नाही. अनेक शाळांमधील शिक्षक त्यांच्या विषयात पारंगत नसल्याचेही समोर आले. त्यांच्या विषयात पारंगत असणारे फारच कमी शिक्षक होते. त्यामुळे आम्ही शिक्षकांचीही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
अधिक वाचा : ‘मॅन्दोस’ आज रात्री महाबलीपूरमजवळ धडकणार
सद्या आम्ही पहिली ते दहावीच्या शिक्षकांच्या परीक्षा घेणार आहोत. या परीक्षांचा स्तर कठीण असणार असून, निगेटिव्ह मार्कींग असणार आहे. प्रश्नांना उत्तरांचे पर्याय दिले जाणार आहेत. गणित, विज्ञान, आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षांवर अधिक भर असेल. सर्वच शाळेत अशा प्रकारे परीक्षा घेतल्या जातील. मात्र, परीक्षा देणे बंधनकारक नसणार आहे.