वनमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नांना यश : पंतप्रधान, गृहमंत्री, सरंक्षणमंत्र्यांकडून मदत,केंद्राकडून आज मिळणार दोन मोठी हेलिकॉप्टर्स
विशेष प्रतिनिधी /पणजी
राज्यातील जंगलांमधील आग थांबण्याचे नाव घेईना. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आणि दोन अतिरिक्त मोठी हेलिकॉप्टर्स मागवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील गोव्यातील फैलावणाऱ्या आगीची गंभीर दखल घेतली आणि अहवाल मागितला आहे. त्याचबरोबर राणे यांना आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले आहे. मुंबईहून मागविलेल्या दोन हेलिकॉप्टर्सद्वारे 14 जंगलांमधील आग विझविण्याचे काम आज हाती घेतले जाईल. दरम्यान वनमंत्र्यांनी नौदलाच्या ध्वजधिकाऱ्यांशी सविस्तर बोलणी केली आणि आग विझविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची मागणी केली. गेले सात दिवस चालू असलेल्या सत्तरीतील जंगलांमधील आग अद्याप विझलेली नाही. केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करून त्यांना सद्यस्थिती कथन केली.
पंतप्रधान, गृहमंत्र्यांना दिला अहवाल
केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनीही फोनवरून राणे यांच्याशी चर्चा केली आणि आग विझविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केंद्रातर्फे दिली जाईल, असे आश्वासन दिले. पंतप्रधान कार्यालयातील पी. के. मिश्रा यांच्याशीही मंत्री राणे यांनी संपर्क साधला. पंतप्रधानांनी गोव्यातील आगीचा अहवाल मागितला आणि त्यांना तो देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनादेखील या दुर्घटनेचा अहवाल राणे यांनी पाठवून दिला आहे. आग बऱ्यापैकी नियंत्रणात असली तरी ती संपुष्टात आलेली नाही. शुक्रवारी दान्ही हेलिकॉप्टर्स नादुऊस्त बनल्याने पाण्याची फवारणी झाली नाही. त्यामुळे आग विझविणे शक्य झाले नाही.
बोंडला जंगलात नव्याने आग
बोंडला येथील जंगलात शुक्रवारी नव्याने आग लागल्याने वनखात्याचे टेन्शन वाढले. मंत्री राणे यांनी सांगितले की बोंडला येथील जंगलाला आग लागल्यानंतर वनखात्याचे रक्षक सर्वत्र तैनात करण्यात आले. त्यांनी बऱ्यापैकी आग आटोक्यात आणली आहे. मात्र वाऱ्यामुळे आग फैलावण्याची शक्यता आहे. वन्य प्राणी संग्रहालयाला कोणतीही झळ बसू नये यासाठी आवश्यक ते सर्व उपाय हाती घेण्यात आल्याचे मंत्री राणे म्हणाले.
झुडपे जळाली, प्राणी सुरक्षित : मंत्री राणे
आगीत मोठी झाडे बेचिराख झाल्याचे काही पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. किती पर्यावरणप्रेमी आग लागल्यानंतर जंगलात पोहोचले होते? वाट्टेल तो अंदाज ते ठोकीत आहेत. प्रत्यक्षात आपण स्वत: जंगलात जाऊन आलोय. मोठी झाडे जळून गेलेली नाहीत. आगीची झळ त्यांना बसलीय. परंतु, झुडपे व गवत जळून खाक झाले. या दुर्घटनेत वन्यप्राणी जळून वा भाजून गेलेले नाहीत. हे सर्व प्राणी सुरक्षित आहेत. राजकारण बाजूला ठेवा. आपल्याला सर्वांनाच आग विझविण्याचे काम प्रथम करायचे आहे, असे राणे म्हणाले.
शुक्रवारी आग लागलेली ठिकाणे
साट्रे-पारोड (सरकारी वनक्षेत्र), साट्रे-सिद्धाची कोंड (सरकारी वनक्षेत्र), साट्रे पूल (नवे सरकारी वनक्षेत्र), कृष्णापूर (सरकारी वनक्षेत्र), देरोडे डोंगर (सरकारी वनक्षेत्र), शिगाव (सरकारी वनक्षेत्र), कालय (सरकारी वनक्षेत्र), अनमोड घाट (सरकारी वनक्षेत्र), तांबडी सुर्ल मोले (सरकारी वनक्षेत्र), गुरखे-धारबांदोडा-उसगाव (सरकारी वनक्षेत्र), पिळये-बोंडला (सरकारी वनक्षेत्र). शुक्रवारी पोत्रे-नेत्रावळी अभयारण्य तसेच कुळे वनरांजीतील सांगोड येथील सरकारी जंगलांना आग लागली. वनकर्मचाऱ्यांना तेथे तातडीने पाचारण करण्यात आले.
आमचा संघर्ष चालू आहे – राणे
वनमंत्री विश्वजीत राणे यांनी तऊण भारतशी बोलताना सांगितले की आमचा आग विझविण्यासाठीचा संघर्ष चालू आहे. वनखात्यातील 512 कर्मचारी आग विझविण्यासाठी जुंपलेले आहेत. याशिवाय अनेक ग्रामस्थ मदतीला धावत आहेत. सर्वांच्या मदतीने आग आटोक्यात आणू. कोणीही काळजी करू नये. आम्ही झुंज देत राहू व यशस्वी ठरू, असे भावनिक आवाहन राणे यांनी जनतेला केले. आपण वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहे. नवनव्या उपाययोजना आखीत आहोत, असेही राणे यांनी सांगितले.