केरळच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान ः
वृत्तसंस्था/ पथनमथिट्टा
केरळचे मंत्री साजी चेरियन यांनी देशाच्या राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही राज्यघटना शोषण करणाऱयांना माफ करते. देशातील अधिकाधिक लोकांना लुटता येईल अशाप्रकारे ही राज्यघटना तयार करण्यात आल्याचे वादग्रस्त विधान चेरियन यांनी केले आहे. पिनाराई विजयन सरकारमधील वरिष्ठ मंत्री स्वतःच्या या विधानावरून टीकेचे धनी ठरले आहेत. भाजपने चेरियन यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तर केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. डाव्या पक्षांच्या नेत्याने अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अलाप्पुझा जिल्हय़ातील चेंगन्नूर मतदारसंघाचे आमदार चेरियन हे राज्याचे सांस्कृतिक तसेच मत्स्योपालन मंत्री आहेत. त्यांनी अलाप्पुझा जिल्हय़ातील मल्लापल्ली येथे आयोजित एका राजकीय कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले आहे. प्रादेशिक भाषेतील वृत्तवाहिन्यांवर मंगळवारी त्यांचे हे भाषण प्रसारित करण्यात आल्यावर हा मुद्दा तापला आहे.
मानवतेच्या प्रारंभापासून शोषण अस्तित्वात आहे. सद्यकाळात धनाढय़ लोक जगावर विजय मिळवत आहेत. शासकीय यंत्रणा या प्रक्रियेच्या बाजूने असणार हे अत्यंत स्वाभाविक आहे. आमच्याकडे उत्तम पद्धतीने तयार करण्यात आलेली राज्यघटना आहे असे सर्वजण म्हणतील, परंतु देशाची राज्यघटना ही अधिकाधिक लोकांना लुटता येईल अशाप्रकारे लिहिण्यात आल्याचे माझे म्हणणे आहे. इंग्रजांनी तयार केलेले भारतीयांनी लिहिले आहे. हे मागील 75 वर्षांपासून लागू आहे. देशाच्या जनतेला लुटण्यासाठी एक सुंदर राज्यघटना असल्याचे मी म्हणेन. परंतु राज्यघटनेत लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यासारख्या काही चांगल्या गोष्टींचे अंश देखील आहेत, परंतु याचा उद्देश सर्वसामान्यांचे शोषण करणे असल्याचे चेरियन यांनी म्हटले आहे.
केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांच्यासह अनेकांनी चेरियन यांच्यावर या विधानाप्रकरणी टीका केली आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी चेरियन विरोधात कारवाई न केल्यास आम्ही कायद्याचा मार्ग अवलंबिणार आहोत असे सतीशन यांनी म्हटले आहे.
केरळच्या कॅबिनेट मंत्र्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून राज्यघटनेच्या रक्षणाची शपथ घेतली, तरीही ते राज्यघटनेची थट्टा करत आहेत, हा प्रकार योग्य नाही. मुख्यमंत्री विजयन यांनी चेरियन यांची त्वरित मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप नेते के.जे. अल्फोन्स यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी चेरियन यांना त्वरित मंत्रिपदावरून हाकलण्याची मागणी केली आहे. चेरियन यांच्या शब्दांमध्ये मार्क्सवादी पक्षाचा राज्यघटनेबद्दलचा अनादर दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.