ममतांनी सोमवारी बोलावली विशेष मंत्रिमंडळ बैठक
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. शिक्षक भरती घोटाळय़ात अडकल्यानंतर पार्थ चटर्जी यांना मंत्रिपदावरून हटवल्यानंतर आता मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची तयारी ममता बॅनर्जी यांनी चालवली आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत घोटाळय़ाच्या आरोपात अडकलेल्या अन्य मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. पार्थ चॅटर्जी यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांव्यतिरिक्त अन्य अनेक पक्षीय पदेही होती. या खात्यांचे फेरवाटपही केले जाणार आहे.
शालेय भरती घोटाळय़ात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेले मंत्री पार्थ चटर्जी यांना पश्चिम बंगाल सरकारने 28 जुलै रोजी पदावरून हटवले आहे. पार्थ चॅटर्जी यांच्याकडे उद्योग, वाणिज्य आणि उपक्रम, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभाग, संसदीय कामकाज विभाग आणि सार्वजनिक उपक्रम आणि औद्योगिक पुनर्रचना विभागाचे प्रभारी मंत्री आदी बरीच खाती होती. ही सर्व खाती सध्या ममतांनी आपल्याकडे ठेवली असली तरी संशयाच्या भोवऱयात अडकलेल्या मंत्र्यांना दूर करून जबाबदार आणि प्रामाणिक नेत्यांकडे अधिक जबाबदारी सोपविण्याचा त्यांचा विचार असल्याचे चर्चिले जात आहे.