प्रतिनिधी/ बेंगळूर
देशाच्या विकासात कृषी आणि तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे कृषी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांचा वापर परिणामकारकपणे करणे आवश्यक आहे. पुढील दशकात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वैज्ञानिकाने कटिबद्ध राहून काम करावे, अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
बेंगळूर शहराबाहेरील जीकेव्हीके कृषी विद्यापीठात आयोजित 107 व्या अखिल भारत विज्ञान काँग्रेस संमेलनाचे उद्घाटन करून ते बोलत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर विकासामांविषयी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून 2020 हे वर्ष सुरू केल्यास आपले स्वप्न साकार होण्याच्या दिशेने निघाल्यासारखे होईल. मागील 50 वर्षांच्या तुलनेत अलिकडील पाच वर्षांच्या कालावधीत आपल्या योजनांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित व्यवहार वाढविले आहेत. अविष्कार, पेटंट, उत्पन्न आणि विकास ही चार पावले आपल्या देशाला वेगाने विकासाकडे नेणार आहे, असे ते म्हणाले.
बेंगळूर शहर सध्या स्टार्टअपसाठी (नवोद्योग) उत्तम व्यासपीठ बनले आहे. जागतिक पातळीवर अंभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रात भारत तिसऱया स्थानावर पोहोचला आहे. अविष्काराच्या निर्देशांकात भारत 52 व्या स्थानावर पोहोचला आहे. या क्षेत्रातील योजनांमुळे गुंतवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. एका देशाची प्रगती विज्ञान आणि तंत्रज्ञानातील यशावर अवलंबून असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
देशातील प्रत्येक खेडय़ांमधील घरांसाठी शौचालय, वीज पुरवठा होण्यास तंत्रज्ञानच कारणीभूत आहे. 8 कोटी जनतेला गॅस कनेक्शन पुरविण्यात आले आहे. नवी गॅस कनेक्शन देण्यासाठी किती केंद्रे असावीत, हे देखील यावरूनच स्पष्ट झाले. रस्ते, गरीबांना 2 कोटीपेक्षा अधिक घरे योग्य वेळेत निर्माण होत आहेत.. रियल टाईम मॉनिटरिंग व्यवस्थेमुळे योजना आणि लाभार्थींमधील अंतर कमी झाले आहे. योग्य वेळेत कामे पूर्ण होत असल्यामुळे खर्चही कमी झाला आहे. शेतकऱयांना कृषी उत्पादने थेट विक्री करणे शक्य झाले आहे. डिजीटल तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, मोबाईल बँकींग सेवांचा लाभ ग्रामीण जनतेलाही होत आहे. शेतकऱयांना हवामानाविषयी पूर्वसूचना देण्याची व्यवस्था विकसित झाली आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री येडियुराप्पा, केंदीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, अखिल भारत विज्ञात काँग्रेसचे अध्यक्ष के. एस. रंगप्पा, जीकेव्हीके कृषी विज्ञापीठाचे कुलगुरु डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते