घाटावर येणार अनेक देवदेवतांच्या पालख्या : पंचगंगेच्या संगमावर शैव-वैष्णवांचा मेळा,हजारोंच्या संख्येने भाविकांची असते गर्दी,वज्याचे साहित्य खरेदीसाठी प्रसिद्ध जत्रा
प्रतिनिधी /डिचोली
गोव्यासह कर्नाटक व महाराष्ट्राच्या काही भागात प्रसिध्द असलेली नार्वे येथील पंचगंगेच्या तिरावर भरणारी श्रीकृष्ण जन्माष्टमीची जत्रा आज मोठय़ा उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी होणार आहे. शैव व वैष्णवांचे मिलन म्हणून ओळखल्या जाणाऱया या जत्रेला प्राचीनकाळापासून महत्त्व आहे. दीपवती (दिवाडी) बेटावरच्या ‘पोरणे तीर्थ’ येथे होणारी ही जत्रा आता डिचोली तालुक्मयातील नार्वे गावात तीर्थार येथे पंचगंगेच्या तिरावर भरते. या जत्रेनिमित्त परिसरातील अनेक देवदेवता पालख्यांतून येऊन दिवसभर विराजमान होणार आहेत.
अनेक वैशिष्टय़े असलेली ही जत्रा म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. पूर्वकाळात ही जत्रा दिवाडी बेटावरील नार्वेत होत होती. या बेटावरील हा जत्रोत्सव म्हणजे सर्वात मोठा उत्सव मानला जायचा. मात्र पोर्तुगीजांनी गोमंतकातील वैभवशाली संस्कृती आणि लोकांमधील देवाची भक्ती नष्ट करण्याच्या उद्देशाने चालविलेला मंदिरांचा विध्वंस आणि बाटाबाटी यात दिवाडी बेटावरील नार्वे गावात असलेले अतिप्राचीन महादेवाचे मंदिर उद्ध्वस्त करून टाकले. ते मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर दिवाडी बेटावरील गोकुळाष्टमीचा महाउत्सवही बंद पाडला. काही वर्षांनंतर येथील लोकांनी महादेवाच्या लिंगाची स्थापना नदीपलीकडे असलेल्या डिचोली तालुक्मयातील हिंदळे (पूर्वीचे नाव) म्हणजेच नार्वे या गावात केली.
माडाचे झावळ पडले पाठीवर
शिवभक्त शिवलिंग घेऊन जाताना त्यांच्या पाठीवर माडाचे झावळ पडले. देवाचा कौल झाला असे मानून त्यांनी सदर लिंगाची स्थापना तिथेच म्हणजे नार्वे गावात केली. या परिसरात म्हणजेच डिचोली परिसरात त्यावेळी सावंतवाडकर भोसलेंची राजवट होती. येथे सुरक्षित राहू या उद्देशाने स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर या हिंदळे म्हणजेच आताचे डिचोलीतील नार्वे या गावातील तिर्थावर गोकुळाष्टमीची जत्रा साजरी होऊ लागली. या तिर्थावर काळभैरव देवाची घुमटी आहे.
पंचगंगेच्या संगमावर येतात देवदेवता
नार्वे तिर्थावर पाच नद्यांचा संगम होतो म्हणून पंचगंगा म्हटले जाते. झुवारी (कुंभारजुवे-बाणस्तारी कालव्यातून येते), म्हादई, खांडेपार नदी (दुधसागर), वाळवंटी व डिचोली या पंचनद्यांचा संगम होत असल्याने या तिर्थाला पवित्र मानले जाते. येथील घाटावर सकाळी पारंपरिक वाटेने नार्वेतील श्री सप्तकोटेश्वर, गिमोणे पिळगावच्या श्रीरामाची, वरगाव पिळगाव येथील चामुंडेश्वरी, पिळगावची श्री शांतादुर्गा, नार्वेतील पिसो रवळनाथ, श्री कणकेश्वरी, डिचोलीतील श्री शांतादुर्गा देवीची पालखी दाखल होते. सर्व पालख्या आपापल्या ठिकाणांवर विराजमान होतात. या घाटावर भाविक बैलपत्र वाहतात आणि देवातांचे दर्शन घेतात. पूर्वी या जत्रेसाठी माशेलच्या देवकीकृष्ण देवाची पालखी जलमार्गे होडीतून यायची.
अभिषेक व अन्य विधींचा उत्सव
पोरणेतीर्थ येथे श्री हाटकेश्वर मंदिरात या दिवशी अभिषेक केला जातो. नार्वेत पंचगंगेच्या किनारी मोठय़ा प्रमाणात भाविकांकडून पितरांचे स्मरण केले जाते. नदीकिनारी स्नान करून असलेल्या ब्राह्मणांमार्फत व्रत उद्यापन करतात. तसेच पती-पत्नी ‘सुपली वायन’ हा विधीही करतात.
या जत्रेत उन पावसाचा खेळ चालूच असतो. राज्य सरकारतर्फे दिवाडी व इतर परिसरातील लोकांना जत्रेला आणण्यासाठी खास फेरीबोटीची सेवा ठेवली जाते. जत्रेत मोठय़ा प्रमाणात चतुर्थीला नववधूला देण्यात येणाऱया वझ्याचे लाकडी सामान उपलब्ध असते. खास या सामानांच्या खरेदीसाठी मोठय़ा संख्येने लोक या जत्रोत्सवात सहभागी होत असतात. तसेच जत्रेच्याच ठिकाणी भाजून गरमागरम चणे उपलब्ध असते. आंब्या फणसाचे ‘साठे’ फणसपोळी विक्रीला असतात. दिवसभर मोठय़ा संख्येने लोकांची ये जा या जत्रेला चालूच असते. घाटावर विराजमान झालेल्या सर्व देवतांच्या पालख्या पुन्हा पारंपरिक वाटेतूनच आपापल्या आदिस्थानात जायला निघतात. संध्याकाळनंतर या भागात कोणीही राहू नये, असे सांगितले जाते. म्हणून संध्याकाळीच जत्रा आटोपली जाते.