मणिपूर हिंसाचारप्रश्नी सरकार गंभीर नसल्यासंबंधीचे निवेदन सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूर हिंसाचारावरून विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे. ‘इंडिया’मधील खासदारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात विविध विरोधी पक्षांच्या एकूण 21 नेत्यांचा समावेश होता. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबतची माहिती दिली. मणिपूरबाबत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले असून त्यावर विचार करू असे आश्वासन राष्ट्रपतींनी दिल्याचे ते म्हणाले.
मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यासंबंधी आम्ही सरकारकडून योग्य उत्तराची अपेक्षा करत आहोत. मात्र, सरकार आमच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. याप्रश्नी आम्ही राष्ट्रपतींची भेट घेत मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवर चर्चा केल्याचे खर्गे यांनी सांगितले. राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना मणिपूरबद्दल माहिती दिली. यावेळे विरोधकांना संसदेत बोलण्यापासून रोखले जात असल्याचा पुनऊच्चार केला. सभागृहात भाषणासाठी उभे राहिल्यानंतर केवळ दोन मिनिटात माझ्या आसनासमोरील माईक बंद केला जातो, असे खर्गे पत्रकार परिषदेत म्हणाले. सभापतींनी सत्ताधारी आणि विरोधकांना समसमान महत्त्व द्यायला हवे. पण मला का बोलू दिले जात नाही, हे कळत नाही अशी विचारणा त्यांनी केली. मणिपूरची चर्चा व्हावी असे सरकारला वाटत नाही. ‘इंडिया’चे शिष्टमंडळ मणिपुरात जाऊन आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला जायला हवे होते, असेही ते पुढे म्हणाले.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी हरियाणातील नूहसह विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचाराबाबतही सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान कार्यालयापासून अवघ्या 100 किमी दूरवरील हरियाणातही दंगली होत असल्याचे खर्गे म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक मणिपूरमधील हिंसाचारावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात या मुद्यावरून गदारोळ सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी संसदेत उत्तर द्यावे, अशी विरोधकांची मागणी आहे.