उंब्रज प्रतिनिधी
या ना त्या कारणाने सतत चर्चेत असलेल्या उंब्रज येथील महावितरण कंपनीचा कारभार रामभरोसे झाला आहे. येथील कामाचा आवाका पाहता सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे. शेती पंपासह नवीन कनेक्शनची कामे, दुरुस्तीची कामे खोळंबली आहेत. काही प्रस्ताव कागदातच अडकले आहेत. तर अधिकारी व कर्मचारी वेळत उपलब्ध होत नाहीत त्यामुळे वीज ग्राहकांची ससेहोलपट सुरू आहे. सद्यस्थितीत महावितरणच्या उंब्रज कार्यालयातील अधिकारी मस्त चाललंय आमचं अशा आविर्भावात असल्याने प्रत्यक्षात अनेक कामे खोळंबली आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
उंब्रज ता.कराड येथील महावितरण कार्यालयातील कामकाजाचा गेल्या तीनचार महिन्यात फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे पुर्वी असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची एकाचवेळी बदली झाली तेव्हापासून बसलेली घडी पुन्हा विस्कटली आहे. त्यासाठी वरिष्ठांनी तातडीने उपाययोजना न केल्यास वीज ग्राहकांचा जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत उंब्रज परिसरातील वीज ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी, व्यावसायिक व सर्व प्रकारच्या वीज ग्राहकाच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी उंब्रज येथे महावितरणच्या विस्तृत जागेत इमारती उभ्या करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र येथे राहण्यास अधिकाऱ्यांना कशाचा कमीपणा वाटतो हा संशोधनाचा विषय असून इमारत धुळ खात पडली असून अधिकारी व कराड व इतर ठिकाणी राहतो. त्यामुळे ऐनवेळी एखादी समस्या निर्माण झाल्यास मोठी पंचाईत होते. येथील कर्मचारी ग्राहकांना दाद देत नाहीत तर अधिकारी उपल्ब्धच नसतात. पाच दिवसांचा आठवडा असताना अधिकारी कार्यालयात वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना हेलापाटे मारावे लागतात.
अधिकारी मुख्यालयात राहत नसल्याने महावितरणनेच्या बोलेरो गाडीचाही गैरवापर सुरू असल्याचे चित्र आहे. भागातील अनेक लहान मोठ्या शेतकऱ्यांची प्रकरणे अडकली आहेत. बाबूगिरी आणि खाबूगिरीचा प्रकार वाढल्याने गोरगरीब शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. उंब्रज वीज वितरण कार्यातून शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत, शेती पंप, हॉटेल कनेक्शनची कामे रखडल्याने मोठे नुकसान होत आहे. दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष असून डिपी व लाईन दुरुस्ती करण्यास टाळाटाळ केली जाते.
वास्तविक उंब्रज येथे महावितरणच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता अशी दोन पदे नियुक्त आहेत. या अधिकाऱ्यांनी मुख्यालयातच राहणे गरजेचे आहे. तसेच वायरमननेहीही नेमलेल्या ज्या त्या गावात राहणे आवश्यक आहे मात्र यावर कोणाचेही नियंत्रण नाही. कागदोपत्री अनेक प्रकरणी प्रलंबित आहेत. लोकांना मीटर वेळेत मिळत नाहीत. अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शेती पंपाचे भारनियमन, बदललेले वेळापत्रक याची माहितीही शेतकऱ्यांना योग्य वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेती पिकांचे पाण्याविना अतोनात नुकसान होत आहे. माहिती विचारणाऱ्या ग्राहकांना कार्यालयातून उद्धट भाषेत उत्तरे देण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाच्या कनेक्शन योजना ग्राहकांपर्यंत पोहोचले जात नाहीत. गरजू ग्राहकाला वीज भरणा करण्यासाठी शेती पंपाला हप्ते करून देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. एखादा डीपी खराब झाला तर त्याची वेळेत दुरुस्ती न करता शेतकऱ्यांना बिले भरण्यासाठी तगादा लावला जातो. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे बील भरणा केला आहे अशा शेतकरीही या भानगडीत होरपळला जात आहे. उंब्रज कार्यालयात तीन महिन्यांपूर्वी कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता चेतन कुंभार व सहाय्यक अभियंता राहुल कराडकर यांनी वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी कोणतीही तडजोड केली नाही त्यामुळे मागील तीनचार वर्षात ग्राहकांच्या अनेक समस्यांचा निपटारा झाला. उंब्रज महावितरण कार्यालयाशी शेकडो गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे कामाचा आवाका मोठा आहे. मात्र येथे सद्यस्थितीत महावितरणच्या प्रवेशव्दारावरील बोर्डाची दुरुस्ती करणेही शक्य नाही. आतील समस्यांचीही फलका प्रमाणेज अवस्था झाल्याने उंब्रज महावितरणला सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे.