जमावाने फेकले पेट्रोलबॉम्ब ; 20 दिवसात पाच मंत्री-आमदारांच्या घरावर हल्ला
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांच्या घरांवर हल्ला झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या घरावरही हल्ला झाला आहे. मणिपूरची राजधानी इंफाळमधील कोंगबा भागातील आर. के. रंजन सिंह यांच्या घरावर गुऊवारी रात्री उशिराने जमावाने हल्ला केला. हल्ल्यादरम्यान जमावाने पेट्रोलबॉम्ब फेकत घर पेटवून दिले. हल्ल्याच्या वेळी आर. के. रंजन सिंह घरी नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, गेल्या पाच दिवसात पाच मंत्री-आमदारांच्या घरावर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी इंफाळमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. जमाव दिसल्यास गोळ्या घालण्याचे आदेश जारी करण्यात आले असतानाही जमाव मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचला. घराच्या चहुबाजुंनी जमाव गोळा झाल्यानंतर पेट्रोलबॉम्बद्वारे हल्ला चढवण्यात आला. याप्रसंगी मंत्र्यांचे 9 वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी, 5 सुरक्षा रक्षक आणि 8 अतिरिक्त रक्षक मंत्र्यांच्या घराच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. मात्र, जमावाच्या तुलनेत सुरक्षा कर्मचारी कमी असल्यामुळे हल्ला रोखता आला नाही. जमावाने चारही दिशांनी घरावर हल्ला करत एकामागून एक अनेक पेट्रोलबॉम्ब फेकल्यामुळे घरात सर्वत्र आग लागल्याची माहिती एका सुरक्षा जवानाने दिली. जमाव प्रचंड असल्याने आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवता न आल्याने आम्ही घटना थांबवू शकलो नाही, असे एस्कॉर्ट कमांडर एल. दिनेश्वर सिंह यांनी सांगितले. जमावामध्ये सुमारे 1,200 लोक सामील असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दीड महिन्यात दुसऱ्यांदा हल्ला
3 मे रोजी मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर मंत्र्यांच्या घरावर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मे महिन्यातही आर. के. रंजन सिंह यांच्या घरावर जमावाने हल्ला केला होता. त्यानंतर सुरक्षा जवानांनी हवेत गोळीबार करत जमावाला पांगवले. तसेच अन्य चार लोकप्रतिनिधींच्या घरावरही यापूर्वी हल्ला झालेला आहे. 5 मे रोजी भाजप आमदारावर हल्ला करण्यात आला होता. तर, 23 मे रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री कोन्थौजम गोविंदा यांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती. 28 मे रोजी सेरो गावातील काँग्रेस आमदार रणजित सिंह यांच्या घराची तोडफोड करून आग लावण्यात आली होती. 9 जून रोजी भाजप आमदार सोरासम के. बी. देवी यांच्या घरावर स्फोटके आणि बॉम्बने हल्ला करण्यात आला होता.
शांततेसाठी प्रयत्न केल्याने हल्ला केल्याची चर्चा
केंद्रीय परराष्ट्र आणि शिक्षण राज्यमंत्री आर. के. रंजन सिंह हे मणिपूरमध्ये हिंसाचार थांबवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करणाऱ्या समितीचे नेतृत्व करत आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी राज्यातील मैतेई आणि कुकी समाजातील ज्येष्ठांची बैठकही बोलावली होती. दोन समुदायांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्ग शोधणे हा या बैठकीचा उद्देश होता. या सर्व प्रयत्नांमुळे सिंह यांना टार्गेट करून त्यांच्या घरावर हल्ला करून ते पेटवून दिल्याची चर्चा आहे.