अनेक धरणे कमालीची आटली : जूनच्या मध्यापर्यंत पुरेल एवढेच पाणी उपलब्ध
प्रतिनिधी / पणजी
राज्याची अतिरिक्त पाण्याची गरज भागविण्यासाठी नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून त्याद्वारे सुमारे 250 एमएलडी पाणी मिळणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्याला मुबलक पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे.
प्रचंड उकाडा आणि काही प्रमाणात लांबलेला पाऊस यामुळे यंदा धरणांच्या जलसाठ्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. परिणामी राज्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विद्यमान स्थितीत राज्याला सुमारे 650 एमएलडी पिण्याच्या पाण्याची गरज आहे. मात्र सध्या केवळ 400 एमएलडीच पाणी मिळत आहे. अशावेळी सरकारने टँकरमुक्तीच्या कितीही घोषणा केल्या तरी आजही अनेक गावे टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहेत हेच सत्य आहे. राज्यातील सुमारे 250 एमएलडी पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक ठिकाणी नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच लोकांना मुबलक पाणी मिळेल, अशी माहिती साबांखातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. उत्तर गोव्यात चांदेल येथे 15 एमएलडीचे दोन प्रकल्प असून त्याद्वारे पेडणे आणि मांद्रे भागातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याशिवाय बार्देश आणि डिचोली तालुक्यातील गावांना अस्नोडा येथे 50, 30 आणि 20 एमएलडी प्रकल्पांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. हे प्रकल्प तिळारी आणि पर्रा नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
त्याशिवाय सांखळी, पडोशे येथे अनुक्रमे 5 व 7 एमएलडीचे प्रकल्प आहेत. तेथून पर्येपर्यंत पाणीपुरवठा होतो. धामसे येथे 15 एमएलडीचा प्रकल्प आहे. पर्वरी येथे 15 एमएलडी प्रकल्प उभारण्यात आला आहे. दक्षिण गोव्यात खांडेपार नदीवर ओपा येथे 115 एमएलडीचे दोन प्रकल्प आहेत. तेथून तिसवाडी, फोंडा तालुक्यातील गावांना पाणी पुरविण्यात येते. त्याशिवाय शिरोडा म्हैसाळ धरणावर 10 एमएलडीचा पाणी प्रकल्प आहे, तर साळावली धरणावर 180 आणि 100 एमएलडीचे दोन प्रकल्प आहेत. चापोली धरण परिसरात श्रीस्थळ येथे 10 आणि 5 एमएलडीच्या प्रकल्पातून काणकोण परिसरातील गावांना पाणी पुरविण्यात येते. दरम्यान, सध्या अनेक धरणांच्या पाण्याची पातळी कमालीची उतरली आहे. तरीही जूनच्या मध्यापर्यंत पुरेल एवढे पाणी उपलब्ध असल्यामुळे पाणीटंचाईच्या चिंतेचे कारण नाही, असा विश्वास सदर अधिकाऱ्याने व्यक्त केला.