सांगरूळ येथील बैठकीत ग्रामस्थांचा इशारा
घरे नियमित करण्याची मागणी
सांगरुळ / वार्ताहर
करवीर तहसीलदारांनी अतिक्रमण धारकांवर कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत .राहण्यास जागा नसल्यामुळे अनेकांनी गावातील गायरान मधील जागेत राहण्यासाठी घरे बांधली आहेत .अनेक अतिक्रमणधारकांना घर बांधण्यासाठी गावात दुसरीकडे स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नाही .शासनाने कारवाई केल्यास ही कुटूंबे उध्दवस्त होणार असून शासनाने ही कारवाई मागे घेऊन घरे नियमित करुन दिली नाहीतर येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय सांगरुळ ग्रामस्थांनी घेतला आहे.
करवीर तहसीलदारांनी येथील सुमारे ५०० कुटूंबांना बजावलेल्या नोटीसामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत, बुधवारी सांगरुळमध्ये बैठक झाली. कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष निवास वातकर म्हणाले, ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावठाण वाढ झालेली नाही. गेल्या साठ वर्षात तीन पटीने लोकसंख्या वाढली, मग त्यांनी रहायचे कोठे? दोन पिढ्या तिथे वास्तव करणाऱ्यांना एका नोटीसीने कोणी बेघर करणार असेल तर ते खपवून घेणार नाही.
माजी उपसरपंच एस. एम. नाळे म्हणाले, मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला, त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कारवाई थंडावली, आता पुन्हा तहसीलदारांनी नोटीसा बजावल्या आहेत. याविरोधात जनआंदोलन उभे करावे लागेल.खंडोबा दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान लोंढे म्हणाले, नोटीसांना उत्तर देऊयाच, पण ज्या लोकप्रतिनिधींच्या मागे आम्ही आयुष्यभर उभे राहिलो, ते जर आता हात झटकत असतील तर दुर्देवी आहे. आमच्या जीवनमरणाचा प्रश्न तयार झाला आहे, याविरोधात सर्व पातळीवर लढाई करत असतानाच आगामी काळातील सर्व निवडणूकांवर बहिष्कार घालूया.
माजी सरपंच सदाशिव खाडे म्हणाले, हे संकट गावावर आले आहे, सर्व मतभेद विसरुन आपण एकसंधपणे त्याला तोंड द्यावे लागेल. ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, सामान्य माणसावर आलेले संकट दूर करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करुया.माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीनाथ खाडे, अरुण खाडे, बदाम खाडे, रंगराव नाळे, विलास नाळे, तानाजी वातकर, प्रशांत वातकर, भीमराव नाळे, सुशांत नाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सुशांत नाळे ,संभाजी नाळे,राजू चाबूक यांचे सह अतिक्रमण धारक व इतर ग्रामस्थही उपस्थित होते.