अध्याय सविसावा
पुऊरवा राजा म्हणाला, सहज मौज म्हणून जरी परस्त्रियांकडे गेले, तरी सज्ञानालासुद्धा ती संगती बाधते. परस्त्रियांची संगत अर्धक्षण करून ज्ञातेही अशा रीतीने ठकले आहेत. म्हणून परस्त्रीसंगावर विश्वास ठेवतील, ते माझ्यासारखेच दु:खी होतील. परस्त्रीसंगावर विश्वास ठेवला असता सहा इंद्रियांचा वर्ग सर्वाना गोत्यात घालतो. एवढ्याकरिता इंद्रियांना आवरून परस्त्रियांचा सर्वथा त्याग करावा. असे विचार व्यक्त करून उर्वशीच्या संगतीने पश्चाताप पावलेला राजा, परस्त्रिची संगत सोडून इंद्रियवृत्तीला आवरून परम शांतीला पावला. राजाचे ऐल गीत आपण सविस्तर अभ्यासले. जो जो परस्त्रियांच्या नादी लागतो त्याची वाट कशी लागते ते आपण पाहिले. राजाने सांगितल्याप्रमाणे काम हा आपला वैरी असून, साधनेत मोठे विघ्न म्हणून तो पुढे उभा राहतो हे लक्षात घेऊन आपणच संयमाने आपली इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवावीत. हा राजाचा लाख मोलाचा उपदेश आपण लक्षात ठेवूयात. पुऊरव्याची कथा सांगून झाल्यावर भगवंत उद्धवाला म्हणाले, राजराजेश्वर पुरूरव्याच्या मनामध्ये जेव्हा अशा तऱ्हेचे उद्गार उमटू लागले, तेव्हा त्याने उर्वशीलोक सोडून दिला आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे त्याचा मोह नाहीसा झाला. नंतर त्याने आपल्या हृदयातच आत्मस्वरूपाने माझा साक्षात्कार करून घेतला व तो शांत झाला. ज्याने उर्वशीसह स्वर्गातील सारे भोग मिळविले, ज्याला देवही श्रेष्ठ समजत, जो सर्व राजांचा मुकुटमणि होता असा चक्रवर्ती पुरूरवा राजा उर्वशीचा व स्वर्गाचा उपभोग घेऊन विरक्त झाला, म्हणून तो एक मोठा भाग्यशालीच राजा होय. काही लोकांना विषयांचे उपभोग घ्यायची संधीच मिळत नाही त्यांची गोष्ट वेगळी. त्यांनी विषयत्याग करून विरक्त होणे हे फारसे अवघड नसते कारण त्यांनी विषयांची चवच चाखली नसते परंतु स्वर्गातील देवांगनेचा उपभोग घेऊनही पुरूरवा राजा विरक्त झाला, हे विशेष! त्याअर्थी तो मोठा धन्य होय. असे उदाहरण फार दुर्मिळ असते कारण एकदा विषयांच्या दलदलीत मनुष्य फसला की, तो त्यात आणखीन आणखीन ऊततच जातो. अगदी त्याने स्वत:हून बाहेर यायचे ठरवले तरी बुडत्याचा पाय खोलात अशीच त्यांची परिस्थिती होऊन विषयांच्या दलदलीतून बाहेर पडणे त्याच्यासाठी महामुश्कील होऊन जाते. म्हणून पुऊरव्याचे विशेष कौतुक वाटते! त्याच्याबद्दल कौतुकोद्गार काढताना भगवंत म्हणाले, तो एका अप्सरेच्या प्रेमात आकंठ बुडालेला होता परंतु नंतर त्याला त्याबद्दल अनुताप झाला आणि त्या अनुतापाच्या भरात आपल्या स्थितीची निंदा करून त्याने परस्त्रीची आसक्ती टाकून दिली व मोहाला खरोखर धुऊन काढले. असे अनुताप होणारेही पुष्कळ असतात पण काही काळाने त्यांना पुन्हा परस्त्री मोहाने वेढून टाकलेले पहायला मिळते परंतु पुऊरवा त्याला अपवाद निघाला. त्याने पश्चात्तापाची आगटी अखंड पेटती ठेवली. चित्तावर वैराग्याची पुटे चढवली. विचाराने नीट इंद्रियदमन करून काममोहाचे डाग त्याने धुऊन टाकले. सोन्याला पुटे दिली असता त्यातला हिणकस भाग जळून गेल्याने त्याचे वजन कमी होते पण कस वाढतो. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाचे ज्ञान होऊन मी म्हणजे हे शरीर नव्हे आणि समोर दिसणारी दुनिया खोटी आहे हे लक्षात आले की, स्वभावातील षड्रिपूंचे प्राबल्य नाहीसे होते. त्यामुळे चित्तशुद्धी होते. अर्थातच अशी चित्तशुद्धी होण्यासाठी मनात येणाऱ्या विचारांवर संयम ठेवण्याची अत्यंत गरज असते. पुऊरव्याचा स्वभाव अत्यंत शुद्ध झाल्यामुळे त्याला विवेकवैराग्यरूप संपत्ती प्राप्त झाली. त्याच्या गैर वागणुकीचा त्याला पूर्ण पश्चात्ताप झाल्याने तो माझ्या कृपाप्रसादाला पात्र झाला. पूर्ण अनुताप होण्यासाठी माणसाला त्रिगुणांच्या पकडीतून निसटावे लागते आणि त्यासाठी माझी कृपा व्हावी लागते. माझ्या कृपेशिवाय देहात कधी अनुताप उत्पन्न होत नाही. ज्याच्या ठिकाणी पूर्ण अनुताप झालेला दिसेल, त्याच्या ठिकाणी माझी परिपूर्ण कृपा आहे म्हणून समजावे. थोडक्मयात माझी कृपा होणे आणि गैर वर्तणुकीचा पश्चात्ताप होऊन तो टिकून राहणे या दोन्ही गोष्टी एकदमच घडतात.
क्रमश: