सोमवारी दुपारी महाराष्ट्र एक्सप्रेस रवाना
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापुरामुळे गेले आठवडाभर ठप्प झालेली रेल्वे सेवा सोमवारी सुरु झाली. सोमवारी दुपारी नागपूर-कोल्हापूर प्रवाशांविनाच आली. तर कोल्हापूर-नागपूर काही प्रवाशांसह रवाना झाली. महालक्ष्मी एक्सप्रेससह अन्य गाड्याही सोमवारी रात्री धावल्या.
कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूरातून होणारी रेल्वे प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. पूर ओसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर-मिरज मार्गावरील रुळाची पाहणी केली असता काही ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र कोल्हापूरातून सुटणाऱ्या गाड्या मिरजेतून सुरु होत्या. सोमवारी दुपारी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. यामुळे रेल्वे सेवा सुरु झाली.
दुपारी महाराष्ट्र आणि हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूरात दाखल झाली. तर नागपूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस रवाना झाली. मात्र प्रवाशांना रेल्वे सुरु झाल्याची माहिती नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद नव्हता. महालक्ष्मी एक्सप्रेससह कोल्हापूरातून अन्य मार्गावर धावणाऱ्या गाड्या सुरळीत सुरु झाल्याची माहिती स्टेशन अधीक्षक ए.आय. फर्नांडिस यांनी दिली.