नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या 38 दिवसांपासून केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी कायदा मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शनिवारी आणखी एका शेतकऱयाने आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर ही घटना घडली. संबंधित शेतकऱयाचे नाव कश्मीर सिंह असे आहे. ते उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील रहिवासी असल्याची माहिती उघड झाली आहे. कश्मीर सिंह यांनी गाझीपूर सीमेवरील एका शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी ठेवली असून त्यात त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपले बलिदान व्यर्थ जाऊ नये. आपले अंत्यसंस्कार दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरच केले जावेत, असेही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे. यापूर्वी 16 डिसेंबर 2020 रोजी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ 65 वर्षीय संत रामसिंग यांनी आत्महत्या केली होती. मृत्युपूर्वी त्यांनी पंजाबी भाषेत सुसाईड नोटही लिहिली होती. शेतकरी आंदोलन हे अत्याचाराविरुद्ध आवाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.