केंद्रीय पर्यटनमंत्र्यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सोमवारी गुवाहाटीत आयोजित परिषदेत बोलताना पर्यटन हे ईशान्येतील राज्यांसाठी गेमचेंजर ठरू शकते आणि केंद्र सरकार याकरता सातत्याने प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. ईशान्येतील राज्ये आणि संबंधित यंत्रणांनी टास्क फोर्स नियुक्त करून परस्परांमध्ये समन्वय प्रस्थापित करत विकासाची कामे सातत्याने सुरू ठेवावीत असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.
पर्यटन मंत्रालय ईशान्येतील पर्यटनाला चालना देण्यासाठी गुवाहाटीमध्ये दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करत आहे. ईशान्येतील राज्यांमध्ये पर्यटनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करावा लागेल आणि त्याकरता काम करावे लागणार आहे. येथे इको टुरिजम, व्हिलेज टुरिजम, मेडिकल, स्पोर्ट्स, ऍडव्हेंचर टुरिजम यासारख्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. पर्यटनाच्या या लक्ष्याच्या पूर्ततेसाठी येथे एक मजबूत आणि पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील असे रेड्डी यांनी उद्घाटनाच्या सत्राला संबोधित करताना म्हटले आहे.
चालू वर्षात इंटरनॅशनल टूरिजम मार्ट नागालँडच्या हॉर्नबिलसोबत आयोजित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. ईशान्येच्या राज्यांमध्ये आतापर्यंत 16 केंद्रीय मंत्र्यांनी दौरे केले आहेत. विकासकामांवर योग्यप्रकारे देखरेख ठेवण्यासाठी अशाचप्रकारे केंद्रीय मंत्री दौरे करत राहणार असल्याचे रेड्डी म्हणाले.
ईशान्येतील राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्कयंत्रणेला बळ द्यावे लागणार आहे. तसेच ब्रँडला प्रोत्साहन द्यावे लागेल. याकरता पुढील 5 वर्षे एकत्रितपणे सर्व राज्यांना दृढनिश्चयासोबत काम करावे लागणार असल्याचे उद्गार आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी यावेळी काढले आहेत.
ईशान्येतील पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित या परिषदेत केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री, आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत ईशान्येतील सर्व राज्यांचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री तसेच केंद्र आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारी एकत्रितपणे भाग घेत आहेत.