आंबोलीत शुक्रवारी पहाटे अपघात : कार 30 फूट खोल कोसळली
वार्ताहर /आंबोली
आंबोली-मुळवंदवाडी येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार 30 फूट खोल कोसळून झालेल्या अपघातात बेळगाव येथील तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास आंबोली-मुळवंदवाडी येथे घडली. येथील हॉटेल मालक रमेश तावडे यांच्या जागरुकतेमुळे जखमींना लागलीच औषधोपचार मिळाले. अधिक उपचारासाठी त्यांना बेळगाव येथे हलविण्यात आले.
बेळगाव येथून पाचजण कारने गोव्याला निघाले होते. वाटेत आंबोली-मुळवंदवाडी येथे कठडा नसलेल्या पुलावर चालकाचा कारवरील ताबा सुटला असावा किंवा चालकाला झोप आल्याने कार विरुद्ध दिशेने पुलावरून थेट 30 फूट खोल कोसळल्याचा अंदाज आहे. त्याठिकाणी पाणी नसल्याने प्रवाशांना बराच मार लागला. यातील तिघांना गंभीर दुखापत झाली तर अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली.
उपलब्ध माहितीनुसार अनिल पाटील (वय 49), रोहिबान तलवार (वय 49), राघवेंद के. वाय. (वय 50), तोरनाप्पा चिमण्या (वय 50), नरिमा शेख (वय 49, सर्व रा. बेळगाव) हे बेळगावहून गोव्याला निघाले होते. अपघातग्रस्त कार पहाटे सव्वातीनच्या सुमारास पुलावरून खाली कोसळली.
पहाट असल्याने मुळवंदवाडी स्टॉपवर हॉटेल चालविणारे रमेश तावडे यांच्या कानी मोठा आवाज आला. त्यांनी लागलीच शिवसेना उपविभागप्रमुख उत्तम पारधी यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. सातारा येथील पर्यटकांना सोबत घेत त्यांनी जखमींना कारमधून बाहेर काढत 108 रुग्णवाहिकेने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे उपचार करून त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु त्यांनी आपण बेळगाव येथे उपचार घेतो, असे सांगितल्याने त्यांना तेथे पाठविण्यात आले.