ऑनलाईन टीम / सातारा :
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसींचा पुरवठा कमी होणे, अथवा रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळू न देणे यासारखे प्रकार चालू असल्याच्या टीका होत आहेत. विरोधी पक्षांनी टीका करणे गैर नाही. मात्र, यातील काही आरोप सिद्ध झाले आहेत. खासगी व्यक्तींनी रेमडेसिवीरचा साठा विकत घेतलेला आहे. खासगी व्यक्तीनेच लस आणली आहे. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्रावर कुरघोड्यांचे राजकारण करू नये, असे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
साताऱ्यात काँग्रेस पक्षाकडून कोरोना सहाय्यता केंदाची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राला भेट देण्यासाठी चव्हाण साताऱ्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोरोना महामारीत केंदाने सर्व राज्यांना एकत्र घेऊन जे नेतृत्त्व करायला हवे होते, ते केले नाही. त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत देशात लसीकरण सुरू करण्यात आले. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना उपकरणांची उपलब्धता पाहिली गेली नाही. त्यामुळे आज अनेक ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे आणि रेमडेसिवीर न मिळाल्याने लोकांचे नाहक प्राण जात आहेत. याला केंद्रातील सर्व नेते जबाबदार आहेत, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान, साताऱ्यात काँग्रेसकडून उभारण्यात आलेल्या कोरोना सहाय्यता केंद्रात टेलिफोन घेण्यासाठी सहा व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीचा फोन आला, तर त्याला मदत करण्याची भूमिका यांची असेल. साताऱयातील रुग्णाला मुंबईत काही गरज असेल, किंवा इतर शहरात काय औषधे हवी असतील, कुठे बेड हवा असेल, तर त्याला मदत करण्याचे काम या केंद्राद्वारे होईल.