वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रशांत क्षेत्रासह हिंदी महासागरात त्रासदायक ठरलेल्या चीनला रोखण्यासाठी चार मोठय़ा जागतिक शक्ती पहिल्यांदाच मालाबारमध्ये एकत्र येण्यास तयार आहेत. यंदाच्या मालाबार नौदल युद्धाभ्यासाठी ऑस्ट्रेलियाला लवकरच भारताचे निमंत्रण मिळू शकते. याचबरोबर पहिल्यांदाच अनौपचारिक दृष्टय़ा निर्माण झालेल्या क्वाड समुहाला सैन्य व्यासपीठावर पाहिले जाणार आहे. क्वाडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियासह जपान तसेच अमेरिकेचा समावेश आहे. भारताने युद्धाभ्यासात ऑस्ट्रेलियाला अद्याप सामील करून घेतले नव्हते. परंतु लडाख सीमेवरील चीनची आगळीक पाहता भारताने ऑस्ट्रेलियाला युद्धाभ्यासात सामील करून घेण्याची योजना आखली आहे.
चालू आठवडय़ात ऑस्ट्रेलियाला औपचारिक स्वरुपात निमंत्रणाचा प्रस्ताव पाठविला जाऊ शकतो. मालाबार यापूर्वी एक मर्यादित सागरी युद्धाभ्यास होता, परंतु आता त्याला हिंद-प्रशांत व्यूहनीतित महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. यांतर्गत हिंदी महासागर क्षेत्रात चीनची पडणारी पावले रोखण्याचे महत्त्वाचे लक्ष्य आहे. मालाबार युद्धाभ्यासात 2015 मध्ये जपानने प्रवेश केला होता.
जागतिक शक्तींची साथ
लडाखमध्ये हिंसक झटापट होण्यापूर्वी भारताने सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या चीनसोबतचे संबंध संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला तसेच अमेरिकेसारख्या अन्य देशांसोबतचे संबंध बळकट केले. चीनवर द्विपक्षीय आर्थिक निर्बंध गरजेचे आहेत. परंतु क्षेत्रीय तसेच जागतिक शक्तींच्या सहकार्याने काम केले तरच चीनवर प्रभाव पाडला जाऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
क्वाडचे बळकटीकरण
क्वाड मजबूत न केल्यास चीनलाच लाभ होणार आहे. चीनला विविध संघटनांच्या निर्देशांचे पालन करण्यास भाग पाडले जात नाही तोवर हिंद-प्रशांत धोरणाचा वापर करावा लागणार असून यात क्वाड केंद्रस्थानी राहणार असल्याचे उद्गार माजी विदेश सचिव शाम सरन यांनी काढले आहेत.
चीनला कठोर संदेश
ऑस्ट्रेलियाला युद्धाभ्यासात समाविष्ट करून घेतल्यास चीन याकडे क्वाडचा सैन्यविस्तार म्हणून पाहू शकत असल्याने भारताने 2017 मध्ये हा निर्णय टाळला होता. परंतु सीमेवरील वाढता तणाव आणि चीनचे आक्रमक वर्तन पाहता भारताने अखेर स्वतःची भूमिका कठोर केली आहे. क्वाडच्या संयुक्त सागरी युद्धाभ्यासातून चीनला महत्त्वाचा संदेश जाणार आहे.