प्रतिनिधी/ रत्नागिरी
सध्या भात कापणी हंगाम सुरू असून विंचूदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महिनाभरात 60 हून अधिक शेतकऱयांना विंचूदंशाची बाधा झाली. विंचू दंशानंतर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा शासकीय रूग्णालयात रूग्णांना दाखल केले जाते. सुरूवातीला काही प्रमाणात या लसींचा तुटवडा होता, मात्र आता पुरेशी उपलब्धता आहे. पुण्यातून 2 दिवसात आणखीन 50 लसी येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
कोरोना काळात शासकीय रूग्णालये हे कोविड सेंटर म्हणून जाहीर झाल्याने इतर आजारांवर वेळेत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हय़ातून वाढत आहेत. मात्र अशी परिस्थिती नसल्याचे सांगतानाच लस उपलब्धता कमी असतानाही रूग्णांची गैरसोय होवू नये म्हणून वेळेत लस उपलब्ध करून दिले आहे. मात्र सध्या तालुक्यात भातकापणी हंगाम सुरू असताना जवळपास 60 विंचूदंशाच्या घटना घडल्या आहेत. या 60 रूग्णांवर सुरळीतपणे उपचार झाले असून सध्या 47 लसीचे कीट उपलब्ध आहेत तर आणखीन 2 दिवसात 50 किटस् जिल्हा शासकीय रूग्णालयाकडे उपलब्ध होणार असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.
किटस्चा साठा टप्प्याटप्प्याने होतोय
कोरानामुळे सर्व शासकीय रूग्णालये हे कोविड रूग्णालय म्हणून जाहीर करण्यात आल्याने उपचारासाठी नेमके कुठे जायचे, याची भीतीही रूग्णांमध्ये आहे. पूर्वी रूग्ण थेट शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत होत.s आता थोडी परिस्थिती कोरोनामुळे बदलल्याने रूग्णांची थोडी तारांबळ उडतेय. मात्र सर्व शासकीय रूग्णालये कोरोना सेंटर म्हणून जरी जाहीर करण्यात आले असले तरी विंचूदंश झाल्यानंतर सर्व प्राथमिक केंद्रांमध्ये उपचार केले जातात. 5 ते 6 किटस्ची या आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्धता असते. मुळात या किटस्चा साठा टप्प्याटप्प्याने होत असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.