जप्त केलेला अर्धा माल हडप : अबकारी विभागाची प्रतिमा मलीन, पारदर्शकतेची आवश्यकता : तपासनाक्यावरील कारभार उघड, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी बदलले
बेळगाव : मार्चअखेरपर्यंत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आचारसंहिता जारी होण्याआधीच जिल्ह्यातील सीमेवर तपासनाके उभारून तपासणी करण्यात येत आहे. खासकरून गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात कुंपणाने शेत खाल्ल्याचा प्रकार अबकारी विभागात घडला आहे. या प्रकारामुळे तपासनाक्यावरील कारभार उघडा पडला आहे. जांबोटी-खानापूर रोडवरील मोदेकोप क्रॉसजवळ 7 मार्च रोजी बाराचाकी कंटेनर अडवून तपासणी केली असता या कंटेनरमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. अबकारी अधिकाऱ्यांनी कंटेनरचालक चंद्रकांत गजेंद्र शेरे (वय 27) रा. उडेगाव, ता. परांडा, जि. धाराशिव याला अटक केली आहे.
कणकुंबीजवळील तपासनाक्यावर सातत्याने तपासणी होते. अबकारी विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर आजवर कोणीच संशय घेतला नव्हता. 7 मार्च रोजी गोवा बनावटीचा 3 हजार 905.28 लिटर दारूसाठा (452 बॉक्स) जप्त करण्यात आला आहे. कंटेनरसह त्याची किंमत 67 लाख 73 हजार 120 इतकी होते, अशी माहिती देण्यात आली. नेहमीप्रमाणे अबकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून प्रसारमाध्यमांनी या कारवाईला ठळक प्रसिद्धी दिली. अबकारी अधिकाऱ्यांनी तपासात कुंपणाने शेत खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पथकातील काही अधिकाऱ्यांनी 301 बॉक्स हडप केले होते. ही धक्कादायक माहिती उघडकीस आल्यानंतर अबकारी विभागाच्या उपायुक्त एम. वनजाक्षी, विजयकुमार हिरेमठ आदी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराला जबाबदार धरून खानापूरचे अबकारी निरीक्षक दावलसाब शिंदोगी, कणकुंबी तपासनाक्यावरील अबकारी निरीक्षक सदाशिव कोरती, उपनिरीक्षक पुष्पा गडादी, खानापूरचे उपनिरीक्षक जयराम हेगडे व कणकुंबी तपासनाक्यावरील कॉन्स्टेबल रायाप्पा मण्णीकेरी यांना निलंबित करण्यात आले आहे. फसवणूक, कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्यांनी हडप केलेला 301 बॉक्स दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
32 लाखांचा दारूसाठा हडप
या कंटेनरमध्ये एकूण 753 बॉक्स दारूसाठा होता. 452 बॉक्स जप्त केल्याचे सांगण्यात आले. उर्वरित 301 बॉक्स खानापूर व सुरलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याची किंमतच 31 लाख 99 हजार 560 रुपये इतकी होते. वाहनासह 99 लाख 72 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करूनही यापैकी 32 लाखांचा दारूसाठा हडप करण्यात आला होता. यामागचा अधिकाऱ्यांचा उद्देश काय आहे? याचा मागोवा घेतला असता बेकायदा दारूवाहतुकीची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना देण्यासाठी हा साठा आपण बाजूला काढला होता, असे लंगडे कारण पुढे करण्यात आले आहे.
चौकशी करण्याची गरज
पोलीस, अबकारी किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणांना खबऱ्यांची मदत लागतेच. खबरी हा कोण बाहेरचा नसतो. त्या त्या व्यवसायातीलच असंतुष्ट खबरी बनलेला असतो. जे मला मिळत नाही, ते दुसऱ्यालाही मिळू नये, यासाठी तपास यंत्रणेला माहिती देऊन बक्षिसी पदरात पाडून घेतली जाते. आता तर अधिकृतरित्या त्यांना बक्षीस देण्याची तरतूद आहे. मात्र, जप्त केलेल्या दारूसाठ्यामध्ये निम्मा साठा त्यांना सुपूर्द करण्याचा नियम कोणत्याच कायद्यात नाही. असे असताना अबकारी अधिकाऱ्यांनी 32 लाखांचा दारूसाठा कशासाठी बाजूला काढला? कोणाच्या सांगण्यावरून हा साठा खबरींना दिला जाणार होता? याची चौकशी करण्याची गरज आहे.
अबकारी अधिकाऱ्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात
कणकुंबी तपासनाका किंवा इतर ठिकाणी अनेकवेळा बेकायदा दारूवाहतूक करणारी वाहने पकडण्यात आली आहेत. या प्रकाराने अबकारी अधिकाऱ्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अबकारी विभागाचे मुख्य कार्यालय बेळगावात आहे. तालुका पातळीवर बेकायदा दारूविरोधात जी काही कारवाई होते; तिची माहिती या मुख्य कार्यालयात किती खरी आणि किती खोटी पुरविली जाते, याविषयीही संशयाचे वातावरण आहे.
काही जणांना पोलीस-अबकारी विभागाचा आशीर्वाद
बेळगाव शहर व तालुक्यात बेकायदा दारूव्यवसाय करणारे अनेकजण आहेत. काही जणांना पोलीस आणि अबकारी विभागाचे आशीर्वाद आहेत. जो अधिकाऱ्यांच्या मर्जीने व्यवसाय करतो; तो विनाअडथळा आपला व्यवसाय चालवतो. अनेक दारूविक्री प्रकरणात तर खाकी वर्दीतील काही जणांची भागीदारी आहे. त्यांच्यावर कधीच छापा टाकला जात नाही. चुकून कारवाई झाली तरी किरकोळ साठा जप्त करून वेळ मारून नेण्यात येते. गोव्यातून रोज बेकायदा दारूवाहतूक होते. महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात हा साठा पोहोचतो. बेळगाव तर गोव्याच्या सीमेवरच आहे. त्यामुळे गोवा दारूची विक्री करणाऱ्यांची संख्या बेळगावात कमी नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी बदलले आहेत. त्यामुळेच कारवाईला सुरुवात झाली आहे.