पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन : कणकवली तालुका शिवसेनेतर्फे वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी / कणकवली:
2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आपला वाढदिवस रत्नागिरी जिल्हय़ात साजरा होत होता. रत्नागिरी जिल्हा जरी माजी कर्मभूमी असली, तरी आज पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्हय़ात, माझ्या जन्मभूमीमध्ये माझा वाढदिवस साजरा होत आहे, याचे समाधान आहे. येत्या वर्षभरात या जिल्हय़ात आपण सांघिकपणे एवढं काम करुया की, पुढील वर्षी अगोदर सिंधुदुर्गमध्ये वाढदिवस साजरा करुया, मग रत्नागिरीत जा, असे आपण म्हणाल, असे सांगताना आपण केलेल्या सत्काराचा पश्चाताप होणार नाही, याची ग्वाही आपण देतो. टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकण्याचे काम आपण करुया, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.
तालुका शिवसेनेच्यावतीने येथील श्रीधर नाईक चौकात सामंत यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार व शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामंत बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, संजय आग्रे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, संदेश पटेल, गितेश कडू, सुजित जाधव, राजू शेटये, दिगंबर पाटील, संदेश पटेल, रामू विखाळे, नगरसेवक कन्हेया पारकर, रुपेश नार्वेकर, राजू राणे, महिला जिल्हा संघटक नीलम सावंत, राजू राठोड, मंगेश सावंत, ऍड. हर्षद गावडे, सुमेधा अंधारी, मानसी मुंज, माही परुळेकर, साक्षी आमडोस्कर, राजू राणे, बाळू पारकर, आनंद आचरेकर, निसार शेख, प्रसाद अंधारी, मिलींद साटम, सतीश नाईक, भास्कर राणे, राष्ट्रवादीचे विलास गावकर, सुभाष सावंत, दिलीप वर्णे, इम्रान शेख, अमित केतरकर, अनिस नाईक, गणेश चौगुले, सचिन सदडेकर, सतीश पाताडे व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सामंत म्हणाले, येथील स्व. श्रीधर नाईक यांच्या पुतळय़ासमोर आपला सत्कार सोहळा होत आहे. त्यांनी विकासाचे जे स्वप्न पाहिले, ते आपण सर्वांनी पूर्ण करुया, हीच त्यांना आदरांजली व आपल्या वाढदिवसाचा संकल्प आहे. राजकारणात कोणी अंगावर आले, तर आपण पळवून लावू शकतो, हे वैभव नाईक यांच्या रुपाने बघितले आहे. बाहेरच्या जिल्हय़ातील कार्यकर्त्याचा होणारा हा सत्कार महत्वपूर्ण आहे. आपण शिवसेना हे कुटुंब म्हणून एकसंधपणे जिल्हा विकासाचे काम करुया. गेल्या 30 वर्षांची मागणी असलेले मेडिकल कॉलेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांची मेहनत आहे. जिल्हा विकास ही आपली जबाबदारी आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लस देण्याबाबतचे नियोजनही करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
वैभव नाईक म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत यांनी वर्षभरात जे काम केले आहे, त्यातून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा जिल्हा विकासाला निश्चितच फायदा झाला आहे. त्यांनी या जिल्हय़ात वेगवेगळे उपक्रम राबविले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीत त्यांचा मोठा हातभार आहे. त्यामुळे पुढील काळात अधिक जोमाने विकास होईल.
सूत्रसंचालन शैलेश भोगले यांनी, तर आभार संदेश पारकर यांनी मानले.