नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची परवानगी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना प्रादुर्भावामुळे विमान प्रवासावर लागू करण्यात आलेले काही निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केले आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरी हवाई मंत्रालयाने विमान कंपन्यांना 85 टक्के क्षमतेने देशांतर्गत उड्डाणे करण्याची परवानगी दिली आहे. मंत्रालयाने आपल्या यापूर्वीच्या आदेशात बदल करून देशांतर्गत विमान उड्डाणाचे वेळापत्रक आणि प्रवाशांच्या मागणीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला. पुढील सूचना येईपर्यंत हे आदेश जारी राहणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. प्रवासादरम्यान कोविड-संबंधित निर्बंध कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना 85 टक्के प्रवासी क्षमतेने उड्डाणे सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या ही प्रवासी क्षमता मर्यादा 72.5 टक्के इतकी होती. यापूर्वी 12 ऑगस्ट रोजी देशांतर्गत विमान कंपन्यांची प्रवासी क्षमता 65 वरून 72.5 टक्केपर्यंत वाढविण्यात आली होती. प्रवासी क्षमतेव्यतिरिक्त विमान वाहतूक मंत्रालयाने भाडय़ांशी संबंधित नियमांमध्येही बदल केले आहेत. आता विमानभाडय़ांची किमान आणि कमाल मर्यादा एका महिन्यात फक्त 15 दिवसांसाठी लागू असेल. विमान कंपन्या 16 व्या दिवसापासून कोणत्याही मर्यादेशिवाय भाडे आकारू शकणार आहेत.
विमान कंपन्यांना मोठा दिलासा
सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विमान कंपन्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, समजा आज तारीख 20 सप्टेंबर आहे, तर 4 ऑक्टोबरपर्यंत भाडेमर्यादा लागू होईल. अशाप्रकारे, 5 ऑक्टोबर रोजीच्या प्रवासासाठी किंवा त्यानंतरच्या कोणत्याही तारखेसाठी, 20 सप्टेंबर रोजी केलेली बुकिंग भाडय़ाच्या मर्यादेद्वारे नियंत्रित केली जाणार नाही. मागील वर्षीच्या देशव्यापी लॉकडाऊननंतर, मे महिन्यामध्ये सरकारने विमान भाडय़ांची मर्यादा निश्चित केली होती.
ऑगस्टमध्ये विमान प्रवाशांमध्ये वाढ
जुलैच्या शेवटच्या आठवडय़ाच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात देशातील हवाई प्रवाशांच्या संख्येत 36 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय, ऑगस्ट 2020 च्या तुलनेत ऑगस्ट 2021 मध्ये प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे.