वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काश्मीरमध्ये बळजबरीच्या धर्मांतराच्या आरोपांदरम्यान शीख युवतीचा मंगळवारी समुदायातील युवकासोबतच विवाह झाला आहे. यापूर्वी युवतीला कथित अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुक्त करत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले होते. तर दिल्लीत शिखांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेत त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये समुदायाच्या मुलींचे बळजबरीचे धर्मांतर आणि विवाहाविषयी माहिती दिली. याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे आश्वासन मंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
युवतीचा विवाह सुखबीर सिंग याच्यासोबत पार पडला आहे. युवक-युवती परस्परांना ओळखत असून कुठलीच बळजबरी करण्यात आलेली नसल्याचे शिरोमणी अकाली दलाचे दिल्लीचे अध्यक्ष परमजीत सिंग यांनी सांगितले आहे.
18 वर्षीय युवतीच्या कथित धर्मांतरानंतर मुस्लीम व्यक्तीशी विवाह झाला नव्हता, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. काश्मीरमध्ये लोकांनी सांप्रदायिक सौहार्द कायम ठेवावा. आम्ही धर्मांतरविरोधी कायदा इच्छित नाही, बहुसंख्याक समुदायाने अल्पसंख्याक समुदायाची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
काश्मीरमध्ये 4 शीख महिलांचे बळजबरीने धर्मांतर करत त्यांचा मुस्लीम व्यक्तींशी विवाह लावून देण्यात आल्याचा आरोप अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी सोमवारी केला होता. श्रीनगरमधील शीख युवतीचे अशाप्रकारे स्वागत करण्यासाठी संगतचे आभार. धर्मांतर करविण्यात आलेल्या युवतीने आज स्वतःचे स्वातंत्र्य परत मिळविले आहे. आशीर्वाद घेण्यासाठी आज ती आमच्यासोबत दिल्लीत आली असल्याचे सिरसा म्हणाले.