ओंलीने टीम/तरुण भारत
सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण, राज्यातील सहाही विधान परिषदेच्या या निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेस आणि भाजप अनुकूल असून तसा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी दिला आहे. भाजपने धुळे-नंदुरबार आणि मुंबईच्या एका जागेसाठी कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली आहे. तसेच मुंबईत एका जागेवर भाजप बिनविरोध आहे, तर एका जागेवर शिवसेना बिनविरोध आहे. नागपूरची जागा सुरुवातीला बिनविरोध होणार आहे, असं बोललं जात होतं. मात्र, आता हा सामना रंगणार आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुनर्वसन करत त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली, तर काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत भाजपमधून आयात केलेल्या रविंद्र भोयर यांना उमेदवारी दिली आहे. भोयर यांचा उमेदवारी अर्ज कायम अजून ते बावनकुळे यांच्याविरोधात लढणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे.
नागपुरात भाजपकडे अधिक मत आहेत. मात्र, काँग्रेसने भाजपमधील ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र भोयर यांना फोडले आणि त्यांनाच उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत, असा दावा भोयर यांनी केला आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे. सदस्यांची पळवापळवी होऊनये यासाठी भाजपचे नगरसेवक पर्यटनासाठी गेल्याचे बोलले जात आहे. भाजपला घोडेबाजाराची भीती असल्यानं नगरसेवकांना पर्यटनासाठी पाठविल्याचे बोलले जात आहे. आता निवडणूक बिनविरोध न होता भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार आहे