कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या तृणमूल काँगेस या सत्ताधारी पक्षातून भाजपमध्ये आमदार व नेत्यांची रीघ लागली आहे. आतापर्यंत या पक्षाचे 10 आमदार भाजपमध्ये समाविष्ट झाले असून त्यामुळे भाजपमधील निष्ठावंतांवर अन्याय होणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. तथापि, राज्य भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी या प्रश्नाचे निराकरण केले आहे. राज्यात पक्षाचा पाया विस्तारण्याची आवश्यकता असून त्यासाठी इतर पक्षांमधील नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. मात्र त्यामुळे भाजपमधील निष्ठावतांवर अन्याय होणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.
तृणमूल किंवा अन्य पक्षांमधून भाजपमध्ये येणाऱया सर्वांना पक्षात महत्वाची पदे दिली जाणार नाहीत. प्रत्येकाचे महत्व ओळखूनच त्याच्यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रारंभापासून भाजपमध्ये असणाऱया आणि राज्यात भाजपसाठी अविश्रांत परिश्रम केलेल्या मूळच्या कार्यकर्त्यांना डावलले जाणार नाही. तथापि, पक्षाचा राज्यात विस्तार होणेही तितकेच महत्वाचे आहे. साहजिकच पक्षात नव्याने आलेले नेते आणि पक्षातील मूळचे सदस्य यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
संख्येची आवश्यकता
पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक आता जवळ येत चालली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकून मोठे आव्हान राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँगेससमोर उभे केले आहे. आता भाजपचा प्रयत्न राज्य विधानसभेत बहुमत मिळविण्याचा आहे. शेवटी लोकशाही व राजकारणात संख्येचे महत्व अनन्यसाधारण असते. इतर पक्षांमधून महत्वाचे नेते भाजपमध्ये येण्यास तयार असतील तर संख्याबळ प्राप्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. ही बाब मूळच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावी व पक्षाला सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी जुन्या भाजप कार्यकर्त्यांना व नेत्यांना केली.