आप युवा विभागाचे उपाध्यक्ष सिद्धेश भगत यांची टीका
प्रतिनिधी /मडगाव
महामारीनंतर अर्थव्यवस्था सावरत असताना भाजप सरकारने इंधन दरवाढ आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतीत भरीव वाढ करून सर्वसामान्यांना झळ पोहोचविली आहे. सामान्य नागरिकांबरोबर पक्षाला सत्तेत ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱया आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचारही भाजपला करावासा वाटलेला नाही. इंधन आणि एलपीजी भारतातील सर्व घरे, अगदी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही वापरतात, अशी टीका आपच्या युवा विभागाचे अखिल भारतीय उपाध्यक्ष सिद्धेश भगत यांनी केली आहे.
चार राज्यांत भाजप निवडून आल्यानंतर ते आता सर्वसामान्यांची परतफेड करत आहेत आणि ती कशी, तर भाजपच्या ताज्या भेटीत इंधन आणि घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारपासून दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांमध्ये एलपीजीच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर, 2021 नंतरची ही पहिली वाढ आहे. सर्व घरांसाठी अत्यावश्यक असलेल्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता दिल्ली आणि मुंबईमध्ये रु. 959.50, कोलकातामध्ये रु. 976, चेन्नईमध्ये रु. 965.50 आणि लखनौमध्ये रु. 987.50 झाली आहे, याकडे भगत यांनी लक्ष वेधले आहे.
गोव्यात नुकत्याच निवडून आलेल्या भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात प्रत्येक घराला तीन एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. भाजप सरकारने घेतलेला दरवाढीचा वरील निर्णय हा त्यांच्या स्वतःच्या जाहीरनाम्याच्या विपरित आहे. निवडणुका झालेल्या संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याआधीच बिघडलेल्या अर्थव्यवस्थेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढविण्यात आल्याने सर्वसामान्यांची पिळवणूक होऊ लागली आहे, असे भगत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.