ऑनलाईन टीम / लखनौ
भाजपच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवण्याची मालिका भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी सुरुच ठेवली आहे. गांधी यांनी वारंवार भाजपच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. याच पार्श्वभुमीवर वरुण गांधी यांनी भाजप पक्ष नेतृत्वालाच प्रश्न विचारला असून ओमिक्रॉनचं संकट असतानाही उत्तर प्रदेशात मोठ्या प्रचारसभांचं आयोजन करण्यावरुन नाराजी जाहीर व्यक्त केली आहे. एकीकडे ओमिक्रॉनचं संकट असल्याने नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला असताना दुसरीकडे निवडणुकीतील शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याने आपल्याला प्राथमिकता ठरवावी लागेल असं स्पष्ट मत वरुण गांधींनी व्यक्त केलं आहे.
यासाठी वरुण गांधी यांनी ट्विट करत युपी निवडणूकीत भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, “रात्री कर्फ्यू लावणं आणि दिवसा प्रचारसभेत लाखो लोकांना बोलावणं हे सामान्य लोकांच्या आकलनापलीकडचं आहे,” अशी खंत वरुण गांधींनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २५ डिसेंबरला गाजियाबादमधील ‘जन विश्वास यात्रे’त उपस्थिती लावली. यासोबतच राज्यात अनेक प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलेलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ते एकाच स्टेजवर दिसणार आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाकडून सध्या पूर्वतयारी सुरु आहे.
वरुण गांधी यांचं हे ट्वीट पक्षाच्या नेतृत्वाकडून अशी वक्तव्यं केली जात असताना दुसरीकडे प्रचारसभा घेण्यावरुन केलेली टीका दिसत आहे. यामुळे भाजपची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. तरी ही भाजप या घऱच्या आहेरातून काय बोध घेणार की, वरुन गांधी यांना सुचना करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.