सई ठाकूर बिजलानी यांच्या हस्ते लोकमान्य महिला सन्मान ठेव योजनेचा शुभारंभ
प्रतिनिधी /म्हापसा
महिलांनी दुसऱया महिलांकडे पाहताना आदर राखणे महत्त्वाचे आहे. आणि तो आदर राखताना त्यात समतोल असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महिलांनी कोविड काळात घरी असताना खूप काम केले आहे. महिला सगळीकडे आदरात वागली. त्यातूनच त्यांना सर्व काही परत मिळणार आहे. महिला सर्व गोष्टींकडे लक्ष देत असते. कोविड काळात कुटुंबियांना सांभाळण्यासाठी महिला वर्गांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उलट सर्व मंडळी घरी असत हे महिलांना चांगले वाटत होते. सिताराम, राधाकृष्ण, गौरी शंकर आदींनी एक आदर दिला आहे. हे लक्षात घेऊन महिलांनी एकमेकांना आदर दिला तर समाजात शांतता येण्यास उशीर लागणार नाही व सर्वत्र समाधान वाटेल. गरीब, श्रीमंत कोणी असो त्यांना आदर देण्यास शिका असे आवाहन ऍड. सोनाली गायतोंडे यांनी म्हापसा येथे बोलताना व्यक्त केले.
लोकमान्य महिला सन्मान 2022 ठेव योजनाचा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी म्हापसा बोशन होम मुख्य शाखेत रितसर शुभारंभ ऍड. गायतोंडे व संचालिका सई ठाकूर बिजलानी यांच्याहस्ते झाल्यावर महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ऍड. गायतोंडे प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलत होत्या.
महिलांनी एकमेकांना आदर द्यावा- सई ठाकूर बिजलानी
यावेळी बोलताना लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या संचालिका सई ठाकूर बिजलानी म्हणाल्या की, प्रत्येक महिलांनी एकमेकांना पाठिंबा द्यायला पाहिजे. पूर्वी बायकाच एकमेकांच्या दुश्मन होत्या मात्र आज त्यात बदल झाला आहे. समाजात कसे वागावे, समाजाला कसा मान सन्मान द्यावा हे महिला वर्गांना कळून चुकले आहे. आज महिला वर्ग आपल्या मुलांकडे लक्ष देऊनही कुटुंब व कार्यालय सांभाळतात ही अभिनंदनपर गोष्ट आहे. महिलांनी एकमेकांचा आदर करून मान सन्मान द्यावा. आम्ही महिला वर्ग आमच्यात बदल घडवून आणू शकत नाही तोपर्यंत समाज बदलू शकत नाही असे सई ठाकूर बिजलानी यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी गंधाली नाईक, श्रद्धा देसाई, प्रियंका साळगावकर, व्हेनेसा लुना, सुजाता वायंगणकर, कुलश्री नार्वेकर, पुष्पा सयरोजी, लोकमान्यचे इतर कर्मचारी तसेच तरुण भारतचे कर्मचारी दिप्ती नाईक, आनंदी विष्णू हिरवे उपस्थित होत्या. प्रणाली कानेकर यांनी सूत्रसंचालन करून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या महिला सन्मान 2022 ठेव योजनेची माहिती दिली. मान्यवरांनी समई दीप व योजनाच्या नामफलकाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. गायत्री दुभाशी नायक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले तर योगिता गोडगे यांनी आभार मानले.