प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आज आणि उद्याही कायम राहणार आहे. त्याच पध्दतीने किर्तीवंत असलेल्या भाऊसाहेब महाराजांचे नाव 16 वर्ष झाले तरी घेतले जाते आणि यापुढेही कायम घेतले जाईल. मृत्यूनंतरही अशा महात्म्यांची नावे कायम ओठावर राहतात ती त्यांच्या किर्तीमुळे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र व असंख्य कार्यकर्ते हा वारसा पुढे चालवत असून असे उदाहरण क्वचितच पहावयास मिळते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे किर्तनकार, थोर समाजप्रबोधनकार आणि समाजसुधारक ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (बीड) यांनी केले.
गांधी मैदान येथे कर्तव्य सोशल ग्रुपतर्फे स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त आयोजित कीर्तन, प्रवचन सोहळ्यात ह.भ.प. समाधान महाराज शर्मा बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले, ह.भ.प. महाराष्ट्रभूषण मदनमहाराज कदम, ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांच्यासह गुरुकूल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आंबेघर (मेढा), ह.भ.प. बबनराव सापते, ह.भ.प. श्रीपती माने, ह.भ.प. उमेश किर्दत महाराज आदी मान्यवरांसह हजारो सातारकर नागरिक आणि महिला उपस्थित होते.
किर्तनाच्या सुरुवातीला रसाळ अंभंगवाणीने आणि टाळ-मृदुंगाच्या गजराने सातारकर भक्तीरसात ओलेचिंब झाले. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘आठवे देव तो करावा उपाव, येर तजीं वाव खटपटा. होई बा जागा होई बा जागा, वाउगा का सिणसिल. जाणिवेच्या भारे भवाचिये डोही, बुडसी तों काहीं निघसि ना. तुका म्हणे देवा पावसील भावें, जाणता ते ठावें काही नव्हे’ या अभंगावर कीर्तन सादर करुन वास्तवाचे भान करुन दिले. आपल्या खास विनोदी शैलीत अनेक विनोदी किस्से सांगून समाधान महाराजांनी उपस्थितांना खळखळून हसायला लावतानाच जीवनातील अनेक वास्तववादी उदाहरणे देवून श्रोत्यांच्या डोळ्यातील पाण्याला वाटही करुन दिली.
या भूतलावर कोणीही अमर नाही. जो चांगले कार्य करतो त्याचेच नाव शेवटपर्यंत राहते. स्व. भाऊसाहेब महाराजांनी समाजकार्य करुन एक आदर्श निर्माण केला. त्यामुळेच आज त्यांचे नाव सर्वांच्या मुखी कायम आहे. त्यामुळे सतकर्म करा, दुसऱयासाठी जगा आणि आपले नाव अमर करा, असा संदेश समाधान महाराज यांनी किर्तनातून दिला. त्यांना गुरुकूल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आंबेघर, वासोळे भजनी मंडळ यांनी साथ दिली.
साधेपण म्हणजेच राजेपण
छत्रपतींच्या घरासमोर कीर्तन करण्याचे भाग्य आज लाभले आहे. ज्या भाऊसाहेब महाराजांनी साधेपण जपलं. त्यांचे सुपुत्र माझ्यासमोर जनसमुदायात बसून कीर्तन ऐकत आहेत. हे साधेपण म्हणजेच या लोकांचे खरे राजेपण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ओठावर घेतले की अंगावर शहारे येतात. अशा किर्तीवंत राजाच्या घराण्यात अभयसिंहराजेंसारखा किर्तीवंत राजा झाला. त्यांच्या कार्यामुळेच त्यांचे नाव आजही घेतले जाते. शिवेंद्रराजे त्यांच्या पित्याचा वारसा दिमाखाने पुढे नेत असल्याने आनंद होत आहे. आजच्या पिढीसमोर शिवेंद्रराजे एक आदर्श आहेत.
विविध ठिकाणी भाऊसाहेब महाराजांना अभिवादन
सकाळपासूनच स्व. भाऊसाहेब महाराजांना विविध स्वराज्य संस्थांमध्ये अभिवादन करण्यात आले. शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. चिंचणी येथे भजन, कीर्तन व अभिवादनाचा कार्यकम झाला. तसेच सातारा नगरपरिषद, सातारा पंचायत समिती, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयासह विविध विकाससेवा सोसायटय़ा व संस्थांच्या कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. भाऊसाहेब महाराजांना अभिवादन करण्यात आले.