अचूक बातमी ‘तरुण भारत”ची, (सातारा पुन्हा लॉकडाऊन केला – स्पेशल) शनिवार, 3 जुलै 21
दीपक प्रभावळकर / सातारा :
● भेदरलेल्या प्रशासनाचे फर्मान ● टेस्टिंग कमी वरून पॉझिटीव्हीटीचा दिखावा ● लोकप्रतिनिधींच्या झोपा?
कित्येक शतकातील महामारीमध्ये डब्ल्युएचओ या जागतिक संघटनेसह भारताच्या आयसीएमआर या संस्थांची बंधने तसूभरपण न पाळणाऱ्या जिल्हा प्रशासनाने साताऱ्यावर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा हातोडा मारला. आख्खा जिल्हा कोंडून छाती बडवणाऱ्या शासकीय नोकरदारांचा उद्यापासून तमाशा पहायला मिळेल. कष्टकरी मेला तरी नोकरदार जगला पाहिजे. याचा पुन्हा एकदा शिरस्ता सुरु होत आहे.
मुळात लॉकडाऊन करण्याचे निकष हे ना जागतिक पातळीवर, ना राष्ट्रीय पातळीवर, ना राज्य पातळीवर तयार झालेले आहेत. कोणत्याही अन्वयार्थांशिवाय किंवा कोणत्याही अभ्यासाशिवाय 100 टक्के पगार आणि कित्येक टक्के भत्ता खाणारे सरकारी अधिकारी हा हातोडा बिनदिक्तपणे गोरगरिब जनतेवर चालवत आहेत.
कोरोना घोटाळादारांना शिक्षा काय?
पॉझिटीव्हीटी रेट या एकमेव निकषावर लॉकडाऊन लावणे पूर्णतः चुकीचे आहे. आख्खी महामारीचे निकष लॅब चालकांवर ठेवून जनतेला वेठीस धरता येणार नाही. त्यामुळे ‘तरुण भारत’ने देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोना अपलोड घोटाळा उघडकीस आणला. त्यामुळेच शासनाला स्वतःची चुकीची आकडेवारी ठेवून ‘अचूक बातमी तरुण भारत’ची यावर विश्वास ठेवावा लागला. यामुळे कोरोना अपलोड घोटाळा झाला आहे हे सिद्ध झाले. मात्र यातील गुन्हेगारांपैकी केवळ दोन टक्के लोकांना तात्पुरत्या शिक्षेचा मुलामा दिला आहे. अंतिम कारवाई काय?
सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या, वाढलेला पॉझिटिव्हीटी रेट व बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवार 3 जुलैपासून पुढील आदेश होईपर्यंत नवे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पुन्हा अंशत: लॉकडाऊन लागू होणार आहे. अत्यावश्यक नसणारी दुकाने पूर्णपणे बंद राहणार असून अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ सकाळी 9 ते दुपारी 2 अशी पाच तासच सुरू राहणार आहेत. दरम्यान, जिल्हय़ात रूग्णवाढ कायम असून 804 बाधित, 627 मुक्त व 25 बळी अशी स्थिती शुक्रवारी होती. यात सर्वाधिक रूग्णांची नोंद कराड तालुक्यात झाली आहे.
संचारबंदी कायम
जिल्हयामध्ये सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत तसेच आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही नागरिकास संचार करण्यास मनाई आहे. शैक्षणिक साहित्य दुकानांना घरपोच सेवेस परवानगी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत शैक्षणिक साहित्य घरपोच पुरवण्यासाठी परवानगी राहील. मॉल, सिनेमागृहे, नाटय़गृहे पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंटस्ही केवळ पार्सल घरपोचसाठी सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. या ठिकाणी बसण्यासाठी परवानगी नाही. लॉजिंग सुविधा पुर्णपणे बंद राहील. बार, परमिटरुम व वाईन शॉपबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करणेत येत आहेत. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकल चालविण्यासाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत परवानगी असेल.
ज्या खासगी कार्यालयांना मुभा देण्यात आलेली आहे, अशी कार्यालये वगळता इतर सर्व खासगी कार्यालये बंद राहतील. शासकीय कार्यालये व ज्या खासगी कार्यालयांना परवानगी देण्यात आलेली आहे, अशा कार्यालयांना 25 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. खुल्या जागेतील क्रीडाविषयक बाबी या सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी असेल.
चित्रीकरण
आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे चित्रीकरण करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक/प्रार्थना स्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे बंद राहतील. तथापि धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपरिक सेवा करता येतील.
लग्ने 25 जणांच्या उपस्थितीत
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, मंगल कार्यालय, हॉलमध्ये लग्न समारंभ दोन तासापेक्षा कमी वेळेत 25 लोकांच्या उपस्थितीत व तहसीलदारांयच परवानगीने घेण्यास संमती राहिल. कोविड निर्बंधांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. जास्तीत जास्त 20 नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करण्यास परवानगी असेल. स्थानिक संस्था, सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी असेल. मजुरांची राहण्याची व्यवस्था असणाऱया बांधकामांना परवानगी देणेत येत आहे. शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व दुरुस्ती दुकाने सर्व दिवस दुपारी 2 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मशागतीस सर्व दिवस सायंकाळी 4 पर्यंत परवानगी असेल. ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा या फक्त अत्यावश्यक बाबीसाठीच चालू ठेवणेस परवानगी असेल. केश कर्तनालय, सौंदर्य केंद्रे येथे फक्त लस घेतलेल्या ग्राहकांसाठीच खुली असणार आहेत. व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर बंद राहतील. सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी राहील. खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील. स्तर पाचमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्हय़ामधून येणाया प्रवाशास ई पास बंधनकारक असेल.
जीवनावश्यक वस्तू उत्पादन घटक, सतत प्रक्रिया उद्योग, राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकांची निर्मिती करणारे उद्योग, डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता अशा यंत्रणा 50 टक्के मर्यादेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल – रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण, व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, ऍनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स, वनाशी संबंधित सर्व कामकाज, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन, चिकन, अंडी, मासे दुकाने, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने, कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा, सार्वजनिक वाहतूक – विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक बस, राज्य व स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम, जिल्हयाच्या पश्चिम भागातील खासगी व्यक्तींची मान्सूनपूर्व कामे, स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या आवश्यक सेवा, सेबीची सर्व कार्यालये, स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन, दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती सेवा, माल वाहतूक, पाणीपुरवठा सेवा, शेतीसंबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे, ई-कॉमर्स, अधिकृत मिडिया, पेट्रोल पंप, पेट्रोलियम संबंधित उत्पादने, डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिसेस, आयटी सेवा, सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, पोस्टल सेवा, कस्टम हाऊस एजंट्स, परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर.
काय सुरू आणि काय राहणार बंद
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहतील. तथापि, वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कोर्सेसला परवानगी असेल. सेतू केंद्र, आधार केंद्र, चार्टर्ड अकौंटंट कार्यालये सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक बाबींची दुकाने/आस्थापना सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहतील. हॉस्पीटलमधील मेडिकल पुर्णवेळ चालू राहतील. अत्यावश्यक नसलेली दुकाने / आस्थापना या पूर्णपणे बंद राहतील.
मुर्खपणाचा हा घ्या पुरावा….
लॉकडाऊनचा निर्णय घेण्याच्या दिवशी साताऱयामध्ये जर 803 बाधित सापडले असतील तर राष्ट्रीय निकषानुसार 16 हजार तपासण्या झाल्या आहेत का? नियमानुसार तपासण्या करत नाही. किंबुहना त्याच्या निम्म्याहून कमी करता आणि त्यामुळेच पॉझिटीव्हीटी रेट भलताच वाढल्याचे सांगून गरिबांच्या नरडय़ावर बसता.
तर लॉकडाऊन लावणारे तुरंगात जाणार?
एक बाधित सापडला की गाव कंटेन्मेंट व्हायचं. नंतर गल्ली व्हायची. त्यानंतर घर व्हायचं. निकष बदलत गेले. मात्र एक बाधित सापडल्यानंतर कॉन्टॅक्ट टेसिंगचे नियम कडक आहेत. तसं होतेय का? जर गाईडलाईननुसार नियम पाळले जात नसतील म्हणजे जे नियम पाळत नाहीत तेच लॉकडाऊन लावत असतील तर त्यांच्या शिक्षेची तरतूद काय आहे? याबाबतही उत्सुकता आहे.
राजधानीमध्ये लोकशाहीचे राजे नसतील तर महाराजे तरी आहेत का?
सातारा जिल्हा अकारण खाईमध्ये लोटला जातोय याचा निर्णय घेताना प्रशासनाने लोकनियुक्त पालकमंत्र्यांना विचारले आहे का? लोकशाहीमधील हे राजे बोलत नसतील तर राजधानी साताऱ्याचे राजे किमान जिल्हा राजधानीबाबत खडे होतील का? साताऱ्यात लोकशाही आहे की राजेशाही याबाबत लोकशाहीतल्या व राजेशाहीतल्या दोन्ही राजांनी हिम्मत असेल तर समोरासमोर येवून चर्चा करावी..! हिम्मत दाखवणार कोण?