प्रतिनिधी / तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील एका १२ वर्षीय अनाथ शाळकरी मुलीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्यात आले. या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास आरोपी बरोबर संगणमत करून तो गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे याप्रकरणी संबंधितावर कारवाई करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी नामदेव धर्मा राठोड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील प्रतिज्ञा अमोल पवार (वय वर्ष १२) या मुलीच्या आई-वडील यांचे १२ वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळे आजोबा नामदेव धर्मा राठोड हे सांभाळ करत होते. दि.२१ मे रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास शौचालयासाठी मोकळ्या पटांगणात गेली होती. शौचालयवरून वापस येताना सुधाकर राठोड व नामदेव राठोड या दोघांच्या अंदाजे दीड फुटाच्या बोळामधून प्रतिज्ञा घराकडे येत असताना सुधाकर राठोड यांनी पत्रे उडून जाऊ नयेत म्हणून घराला विद्युत महावितरण तारेच्या ओढण्या बांधल्या होत्या. बोळातून येत असताना प्रतिज्ञाच्या डाव्या हाताला म्हणजे सुधाकर राठोड यांच्या भिंतीला महावितरणच्या सोडलेल्या ओढणीला हात लागून प्रतिज्ञा हिला विद्युत शॉक लागून प्रतिज्ञाचा जाग्यावरच मृत्यू झाला.
हा प्रकार जाणून बुजून भावकीमधील वैर असताना जाणीवपूर्वक सुधाकर सुभाष राठोड, गणेश सुभाष राठोड, धोंडीराम सुभाष राठोड व सुभाष राठोड या सर्वांनी संगनमत करून नामदेव राठोड यांना ठार मारण्याचा कट रचला होता. परंतू त्या वेळेस प्रतिज्ञा शौचालयास गेल्यामुळे वरील चार लोकांनी प्रतिज्ञाला विद्युत करंट देऊन ठार मारले. हा प्रकार भावकीमधील पूर्ववैमनस्यातून असल्याचा कारणामुळे या हत्येचा कट रचला होता. तर प्रतिज्ञाचा मृत्यू होताच वरील चारही लोक घटनास्थळावरून पसार झाले. ही माहिती पोलिस पाटील यांना दिली असता त्यांनी वरील लोकांना पाठीशी घालून सदर गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नामदेव यांनी स्वतः नळदुर्ग पोलिस स्टेशन येथे हजर राहून घडलेला प्रकार सांगितला.
त्यानुसार घटना घडल्यानंतर अंदाजे एक वाजता घटनास्थळी पोलिस निरीक्षक जितेंद्र लहाने, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र कोळी हे घटनास्थळी पोलिस हजर झाले व घटनेची विचारणा केली. घटनास्थळीचे फोटो घेण्यात आले मात्र घटनेचा पंचनामा न करता पोलिस तिथून निघून गेले. पीएम झाल्यानंतर प्रतिज्ञाचा मृतदेह आम्ही नळदुर्ग पोलिस ठाण्यात घेऊन जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत पोलिस स्टेशन बाहेर काढणार नव्हतो. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन तुम्ही म्हणाल त्या प्रमाणे गुन्हा दाखल करू, असे सांगितले.
त्यामुळे आम्ही प्रतिज्ञा हिचा अंत्यविधी केला. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस स्टेशन येथे रितसर तक्रार दिली. पोलिसांनी दाब देऊन फिर्याद न वाचून दाखविता सही करण्यास भाग पाडले. मात्र कोणत्याही प्रकारची फिर्याद वाचू दिली नाही. त्यामुळे वरील चार व्यक्तीसोबत संगणमत करून पोलिसांनी गुन्हा दडपण्याच्या दृष्टिकोनातून गुन्ह्याची कलमे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आली आहेत. तर घटना दि. २१ मे रोजी घडली असताना पोलिसांनी जाणीवपूर्वक २५ मे रोजी गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे आरोपींना पुरावे नष्ट करण्यासाठी ४ दिवसाचा वेळ पोलिसांकडून देण्यात आला. तसेच गुन्हा दाखल करताना कलम ३०४ अ/३४
नुसार फिर्यादीस विश्वासात न घेता सदर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार मी माझ्या न्यायासाठी दि. २८ मे रोजी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन न्याय मिळण्याबाबत अर्ज केला. परंतू पोलिसांनी कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत कारवाई केलेली नसल्यामुळे याची सखोल माहिती घेऊन आरोपींवर ३०२ नुसार तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा. अन्यथा मला जर न्याय मिळाला नाही व माझ्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास वरील चार लोकांबरोबर नळदुर्ग पोलिस स्टेशनचे पोलिस जबाबदार राहतील असा इशारा नामदेव राठोड यांनी दिला आहे.