महादेव बन्ने/ निपाणी
आपल्या पाल्याचे लाड पुरवत त्यांना स्मार्टफोन घेऊन देणे हे आता पालकांसाठी धोकादायक बनत असल्याचे दिसून येत आहे. अनेक मुले स्मार्टफोनच्या आहारी जाताना अनेक टोकाची भूमिका घेत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास स्मार्टफोन देण्यापूर्वी विचार करावा, असा सल्ला मानसोपचार तज्ञांकडून दिला जात आहे.
1 फेब्रुवारी रोजी आईने मोबाईलचा वापर कमी कर म्हटल्याच्या क्षुल्लक कारणावरून नाईंग्लज येथील पंधरा वषीय शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या केली. याशिवाय काकती येथे पब्जी खेळण्याच्या वादातून युवकाने आपल्या जन्मदात्याचाच खून केला. शिवाय पब्जी खेळाच्या व्यसनाने कुडित्रे येथील 24 वषीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एकूणच शाळकरी मुले तसेच युवकांच्या हातामध्ये स्मार्टफोन देणे ही एक धोक्मयाची घंटा असून पालकांनी वेळीच या प्रकरणी जागृत होणे गरजेचे बनले आहे.
मुलांचा हट्टापायी अनेक पालक त्यांना स्मार्टफोन देऊन आपली जबाबदारी संपली असे समजतात. मात्र मुलांकडून या स्मार्टफोनचा किती व कसा वापर होतो याकडे मात्र पालक लक्ष देत नाहीत. यातून अनेक मुले स्मार्टफोनमध्ये दंग होऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. पब्जी, ब्लू व्हेल, पोकेमन गो, फ्री फायर आदी सारखे विविध खेळ मुले आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ती खेळत बसतात. पालक मात्र त्यांचे लाड पुरवत अशा घटनांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात. याचा परिणाम म्हणून मुले स्मार्टफोनच्या आहारी जाऊन त्यांना गेम खेळण्याचे व्यसन जडते. काही मिनिटांसाठी जरी स्मार्टफोन सोबत नसला तरी अशा मुलांना करमत नाही. यातून ते हिंसक बनत जातात. अनेकदा मुलांकडून टोकाची भूमिका घेतली जाते. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन आपल्या पाल्याच्या हातात स्मार्टफोन देण्यापूर्वी त्याला त्याची जबाबदारी यांची जाणीव करून देणे गरजेचे आहे. शिवाय मुले जर अल्पवयीन असतील तर त्यांना स्मार्टफोनपासून दूर ठेवण्यात उत्तम ठरेल, असे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले.
वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष
संवादाची साधने प्रगत होत असतानाच वाचनाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी मुले वाचण्यासाठी ग्रंथालय, शाळेत, घरात बसत होती. मात्र आता अनेक ठिकाणी वाचनाऐवजी मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसून येतो. पालक ही आपल्या मुलांच्या वाचनाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पालकांनीही स्वतःची जबाबदारी ओळखत आपल्या मुलांना वाचन संस्कृतीकडे वळविणे गरजेचे आहे.
एकत्र कुटुंब पद्धतीचा कमीपणा
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरामध्ये अनेक व्यक्ती असायच्या. त्यामुळे त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी, हितगूज साधण्यामध्ये वेळ जात असे. मात्र आता एकत्र कुटुंब पद्धत कमी होत चालल्याने घरातील व्यक्तींचीही संख्या कमी होत आहे. त्यामुळे घरात एकटय़ा राहणाऱया मुलाकडे पालक स्मार्टफोन देऊन मोकळे होतात. मात्र याचा अतिवापर होऊन मुले या स्मार्टफोनच्या आहारी जात असल्याचे विदारक दृश्य दिसून येत आहे.