15,878 शेतकऱयांना लाभ
216 कोटीच्या वितरणाचे बँकांसमोर आव्हान
प्रतिनिधी / ओरोस:
खरीप हंगामासाठी 15 हजार 878 शेतकऱयांना 95 कोटी 13 लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. यात जिल्हा बँकेने आघाडी घेतली असून जूनअखेर 46 कोटी सहा लाख 93 हजाराचे कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बॅंका मात्र मागे पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयकृत सुमारे 35 बॅंका असून उद्दिष्टाच्या केवळ 22.15 टक्केच कर्ज वितरण झाले आहे. सर्व बँकांना मिळून 311 कोटीचे कर्ज वाटप उद्दिष्ट देण्यात आले असल्याने उर्वरित 216 कोटीच्या कर्ज वितरणाचा पल्ला गाठण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अन्य राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बॅंका यांना खरीप हंगामासाठी शेतकऱयांना 311 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जूनच्या सुरुवातीलाच बी-बियाणे, खते, शेती साहित्य खरेदी केले जाते. यासाठी शेतकऱयाला मोठय़ा प्रमाणात पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे याच कालावधीत जास्तीत जास्त कर्ज वितरण होणे अपेक्षित आहे.
दरम्यान, 2020-21 च्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत जिल्हय़ातील 15 हजार 878 शेतकऱयांच्या 9 हजार 788 हेक्टर क्षेत्रासाठी 95 कोटी 13 लाख 93 हजार रुपये एवढे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. 30 जून पर्यंत झालेल्या वाटपात एकूण उद्दिष्टाच्या 30.59 टक्के एवढेच याचे प्रमाण आहे. जिल्हय़ातील राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या केवळ 22.15 टक्के एवढे उद्दिष्ट पार केले आहे.
जिल्हा बँकेला 104 कोटी 50 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. बँकेने 30 जूनपर्यंत 12 हजार 14 शेतकऱयांना 46 कोटी सहा लाख 93 हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे बँकेचे 44.09 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. तर उर्वरित कालावधीत 55.91 टक्के कर्ज वाटप करावे लागणार आहे.
उर्वरित कालावधीत कर्ज वाटपाचे आव्हान
जिल्हय़ात 35 राष्ट्रीयकृत बँका आहेत. या सर्व बँकांना मिळून 196 कोटी 50 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 30 जून पर्यंत 3 हजार 327 शेतकऱयांना केवळ 43 कोटी 52 लाख रुपये एवढय़ा रकमेचे कर्ज वाटप झाले आहे. 22.15 टक्के उद्दिष्ट साध्य करणाऱया या बँकांना उर्वरित कालावधीत 77.85 टक्के कर्ज वाटप करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
उद्दिष्टाच्या 55 टक्के वाटप
जिल्हय़ातील ग्रामीण बँकांना 10 कोटी रुपये खरीप हंगाम पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यातील 5 कोटी 55 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे उद्दिष्टाच्या 55 टक्के वाटप केले असून 537 शेतकऱयांना याचा लाभ देण्यात आला आहे. ग्रामीण बॅकांचे उद्दिष्ट कमी असल्याने त्यांचे वाटपाचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. दरम्यान, त्यांना यापुढील कालावधीत चार कोटी 45 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे.
उर्वरित कालावधीत पल्ला गाठणार का ? खरीप हंगामासाठी साधारणत: जून महिन्यात शेतकरी बँकांकडून कर्ज घेतात. याच कालावधीत बी-बियाणे, खते, शेती साहित्य मोठय़ा प्रमाणात खरेदी केले जाते. यावषी जून महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्हय़ात पुरेसा पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील निम्म्याहून अधिक भात शेतीची कामे पूर्ण झाली आहेत. 311 कोटीपैकी उर्वरित सुमारे 216 कोटीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत असली तरी यापुढे हे कर्ज वाटप आणि उचल होऊन बँकांचे 100 टक्के उद्दिष्ट साध्य होणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.