इस्लामपुरात आत्मनिर्भर यात्रेचा समारोप : मोदींच्या विधेयकाचे सुरुवातीला स्वागत अन् नंतर विरोध : राजकीय दुकानदारी बंद पडण्याची भीती
प्रतिनिधी/इस्लामपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचे कायदे अध्यादेश काढून केले. त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे आदेश काढले. पण, राजकीय दुकानदारी बंद होईल, म्हणून हे पत्र मागे घेतले. ही त्यांची भूमिका दुटप्पी व लोकांत संभ्रम निर्माण करणारी आहे. पंजाब आणि हरियाणा वगळता या कायद्यांना कुठेच विरोध नाही. गरीब व शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱया मोदींना विरोध करणाऱयांना शेतकरीच जागा दाखवून देतील, असा इशारा विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
भारतीय जनता किसान मोर्चा व रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप समारंभात ते येथील गांधी चौकात बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, खा.संजय पाटील, माजी खा.धनंजय महाडीक, आ.सुरेश खाडे, आ. सदाभाऊ खोत, आ.सुरेश हळवणकर, आ. गोपिचंद पडळकर, आ.सुधीर गाडगीळ, अमल महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, समजित घाडगे, प्राजक्ता कोरे, स्वाती शिंदे, भाजपा प्रदेश कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक, सागर खोत यांच्यासह अन्य उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, कायदे करण्याची मागणी अनेक वर्षाची होती. पण आडते आणि दलालांच्या साखळीच्या ताकदी पुढे ते करण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती, ती हिंमत पंतप्रधान मोदींनी दाखवली. आता तेच विरोध करीत आहेत. बाजार समिती बंद होतील, असा कायदा करीत आहेत. सन 2019 ला काँग्रेसच्या जाहीर नाम्यात बाजार समित्यात शेतकऱयांची पिळवणूक होत असल्याने त्या मोडीत काढू, असे म्हटले होते. चार वर्षापूर्वी फळ-भाजीपाला नियमनमुक्त केल्याने शेतकरी मुक्त झाला आहे.
मोदी यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत, असे सांगून फडणवीस म्हणाले, कंत्राटी शेतीतून उद्योजक व व्यापाऱयांना नव्हे तर शेतकऱयांना अधिकार दिले आहेत. साखर कारखानदारीला न्याय दिला आहे. एफआरपीसाठी साडे तीन हजार कोटी रुपये दिले आहेत. त्याच बरोबर इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी शेतमालच नव्हे तर इंधन ही देणार आहे. मोदी यांच्यावर भ्रष्टाचार व विकासाच्या बाबतीत आरोप लावता येत नसल्याने विरोधकांचा रेटून खोटं बोलून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मूठभर शेकऱयांना कायदे नको आहेत. परंतु देशातील शेतकऱयांच्यावर अन्याय होत आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांच्या हिताचे निर्णय घेतले. शेतमजुरांना तीन हजार रुपये पेन्शन दिली. आमच्या सरकारच्या काळात पिक विमा, भरपाई योजना दिली. सर्व शेतकऱयांनी पाठिंबा दिला आहे. मार्केट कमिटया बंद होणार नाहीत, मार्केट कमिटयासह शेतकऱयांना बाहेर ही माल विकता येईल, व इतत्र ही विकता येणार आहे, अशी तरतूद या कायद्यात आहे.
आ. सदाभाऊ खोत म्हणाले, अनेकांना शेतकरी गुलामीत रहावा असे वाटते, त्यामुळे कायदांना विरोध आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात दलाल व आडते आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी गैरसमज पसरवत आहे. पंतप्रधान मोदी यांना शेतकऱयांना जोखडातून मुक्त केले असून सत्तेसाठी व राजकारणासाठी लाचार न होता. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांच्यासाठी लढेन. आ. पडळकर म्हणाले, गेल्या 70 वर्षात खावून ही काँग्रेस व राष्ट्रवादीची भूक भागलेली नाही. राज्य सरकार विश्वास घाताने आले आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांच्या पायातील बेडया काढून टाकल्या. शेतकरी आता जागृत झाला आहे. राज्यभर ही यात्रा घेवून जाणार आहे.
प्रास्ताविक भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते स्वरूपराव पाटील, पक्षप्रतोद विक्रम पाटील, नगरसेवक सतीश महाडिक, नगरसेवक कपिल ओसवाल, नगरसेवक अमित ओसवाल, नगरसेवक चेतन शिंदे, जलाल मुल्ला, गजानन फल्ले, महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात यांच्यासह वाळवा शिराळा तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
इस्लामपूरसाठी 184 कोटी रुपये
इस्लामपूरच्या विकासासाठी निधी दिला नाही, असे जयंत पाटील म्हणत आहेत. पण मी नगरपालिका निवडणूक प्रचाराला आलो, त्यावेळी शब्द दिला होता. याबाबत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना विचारले. पण शहरातील भुयारी गटारसह अन्य विकासासाठी 184 कोटी रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींनी पवारांच्या मनातील केले
यावेळी फडणवीस म्हणाले, शरद पवार हे द्रष्टे नेते आहेत. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात बारामतीतून ज्यावेळी पुणे-मुंबई, वाशी मार्केटमध्ये शेतमाल जातो, तेंव्हा तोलाई, हमाली ही शेतकऱयांच्या घामातून जाते. ही सक्ती का ? असे लिहिले आहे. पण, पंतप्रधान मोदी यांनी या कायद्यातून शेतीमाल बाहेर विकण्यास परवानगी देवून पवार यांच्या मनातील केले असताना विरोध का ? असा सवाल केला.