पायी दिंडी नव्हे तर चक्क वाहनातून आंदोलन गेले मुंबईला
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने नामदेव पायरी ते मंत्रालय असा पायी दिंडी आक्रोश मोर्चा आज, शनिवारी निघणार होता. त्याप्रमाणे नामदेव पायरीचे दर्शन मराठा आंदोलकांनी घेतले. मात्र आचारसंहितेच्या नियमाचा अडसर असल्यामुळे दहा वाहनांमधून मराठा आंदोलक हे पंढरपूरहून मुंबईकडे निघाले आहेत.
विठ्ठल मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली होती. तर शहरात जमाबंदी होती. अशा परिस्थितीत देखील सुमारे शंभरच्या आसपास मराठा आंदोलन हे रस्त्यावर उतरले. सदरच्या आंदोलकांनी संचारबंदी च्या क्षेत्रात जाऊन विठ्ठल मंदिराजवळ नामदेव पायरीचे दर्शन घेतले. आणि विठोबाकडे सरकारला मराठा आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी. असे साकडे घातले.
त्यानंतर मराठा आंदोलकांचा पायी दिंडी आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी चौक येथून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापर्यंत चालत आला. या ठिकाणाहून हा मोर्चा 10 वाहनातून मुंबईकडे निघाला आहे. यामध्ये प्रशासन आणि आंदोलनातील चर्चेअंती पुणे पदवीधर मतदारसंघाचे आचारसंहितेचे नियम व कोरोनाची परिस्थिती पाहता. लाँगमार्च काढता येत नाही. यामुळे आंदोलन हे वाहनातून मुंबई येथे निघाले आहेत. मराठा आंदोलकांना मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची नाही पण मुख्य सचिवांची भेट होणार असल्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
तीन महिन्यापूर्वी पंढरपूरला झालेल्या आषाढी यात्रेदरम्यान पायी दिंडी सोहळ्याला कोरोनामुळे येण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यावेळीस संतासह वारकरी एसटी बस मधून पंढरीत आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मराठा बांधव हे दहा वाहनांमधून मुंबईकडे निघाले आहेत. विशेष म्हणजे या मराठा आंदोलनात आंदोलका पेक्षा पोलिसांचा फौजफाटा अधिकचा होता.