राज्य शासनाकडून कोकणातील आंबा बागायतदारांची घोर फसवणूक : लोकपतिनिधींचे दुर्लक्ष, 30 डिसेंबर रोजी लाक्षणिक धरणे : 26 जानेवारी ला तीव्र आंदोलनाचा कोकण हापूस आंबा उत्पादन व विकेते संघटनेचा इशारा
रत्नागिरी / प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी सन 2014-15 साली काढलेल्या कर्जातील 6 टक्के व्याजदार माफ करण्याचा राज्य शासनाकडून अध्यादेश झाला. परंतु अर्थसंकल्पात तरतुदच न झाल्याने त्याचा फायदा बागायतदारांना होऊ शकलेला नाही. त्या सालापासून आजपर्यंत जे जे शासन कारभारी खुर्चीत बसले त्यांनी नुसती आश्वासने देण्यापलीकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे कर्जासाठी बॅंकांकडुन नोटीस, जप्तीच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. आम्हाला कर्ज माफीचा कोणताही दिलासा लोकप्रतिनिधीकडुन मिळालेला नसल्याने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शासनाला जागा यावी, यासाठी शुक्रवार 30 डिसेंबर रोजी रत्नागिरीत एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही दखल न घेतल्यास 26 जानेवारीला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोकण हापूस आंबा उत्पादन आणि उत्पादक विकेते सहकारी संस्थेने पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.
रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात यासंदर्भात बुधवारी या संघटनेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, उपाध्यक्ष प्रकाश साळवी, रविकिरण तोडणकर, अभिजित वैद्य, मंदार, आक्रम नाकवा, हेमंत पावर, बाळू रामगडे, सदाशिव पाचकुडे, राजेंद्र कदम आदी उपस्थित होते. चक्रीवादळानंतर मोठ्या आर्थिक संकटात आलेल्या आंबा बागायतदारांनी वारंवार अनेक आदोलन केली, निवेदने दिली. तरी देखील शासनाकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. गेली आठ ते दहा वर्षे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना खराब हवामान, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, कोरोना या नैसर्गिक संकटांमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. शासनाला तसेच येथील स्थानिक मंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्ह्यातील आमदाराना वारंवार निवेदने दिलेली आहेत. परंतु शासनस्तरावरून आंबा बागायतदारांच्या मागणीची दखल घेतली जात नाही.
येथील आंबा बागायतदार शेतकरी दिवसेदिवस अधिक आर्थिक अडचणीत आलेले आहेत. आमच्या निवेदनाची दखल घेतली जात नसल्याने शासनाचे खास करून सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी 30 डिसेंबरला सकाळी 11.00 ते 4.00 या दरम्याने एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलन कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी प्रमुख उपस्थितीत सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री व बागायतदाराची बैठक घेतली जावी. थकित कर्जातून बागायतदारांची मुक्तता करावी. त्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास 26 जानेवारीला कोकणातील आंबा बागायतदार उग्र आदोलन छेडतील, असा इशारा या पत्रकार परिषदेत संघटनेचे नेते प्रकाश उर्फ बावा साळवी यांनी दिला आहे.
कर्जवसुलीसाठी नोटीसा ; घर जप्तीपर्यंत बँकांच्या पवित्र्याने आंबा बागायतदार हवालदील
अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. कर्जांचे पुनर्रगठण केले असले तरी तेव्हा वर्षाचे व्याज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण ते न करता आता बॅंकांनी 13 ते 14 टक्केने कर्ज वसुली सुरू केली आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना नोटीसा आल्या आहेत. घर जप्तीपर्यंत ही प्रकरणे गेली आहेत. ही वसूली झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळत नाही. कोकणातील असे 1 लाख 9 हजार 647 कर्जदार आहेत. त्यापैकी 11 हजार बागायतदार पुर्ण थकीत आहेत. हे थकीत बागायतदार मोठ्या संकटात आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी संघटनेची मागणी आहे.