ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांचे प्रतिपादन ‘कोकणी की लोकप्रिय कहानियाँ’ हिंदी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी /पणजी
अनुवाद ही काळाची गरज आहे. पण तरीही अनुवाद करण्याकडे फारसे कुणी वळत नाही. याचे कारण सरकारचे अनुवादित पुस्तकांकडे फारसे लक्ष नाही आहे. अनुवादित पुस्तकांनादेखील सरकारने पुरस्कार दिले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी लेखक दामोदर मावजो यांनी केले. कोंकणी की लोकप्रिय कहानियाँ या कोंकणी कथांच्या हिंदी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पुस्तकाच्या संपादिका ज्योती कुंकळयेकर, माजी कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप व ऋषिकेश मिश्रा व्यासपीठावर उपस्थित होते.
मावजो यांनी पुस्तकाचे कौतुक केले. अनुवाद करणे एक कला असते. ती ज्याला जमली तो व्यक्ती मूळ कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यास यशस्वी होतो असे ते म्हणाले. हिंदी व इंग्रजी या अनुवादासाठीच्या फिल्टर भाषा असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट करून सांगितले. बहुसंख्य लोक बोलतात म्हणून हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. मात्र बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून कोंकणीच राष्ट्रभाषा करूयात असे मावजो यांनीआपल्या भाषणात सांगितले. आणि सभागृहात हशा फुटला. पण जर भाषेचे जतन करायचे असेल तर जी भाषा कमी लोक बोलतात ती भाषा सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी हा उत्तम उपाय असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमात बोलत असताना ऋषिकेश मिश्रा यांनी प्रादेशिक भाषांचे महत्व विशद केले. प्रादेशिक भाषा पुढे गेल्या तरच भाषा समृद्धी टिकून राहील असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषेबद्दल आपण संवेदनशील असणे गरजेचे आहे असे सांगत त्यांनी 50 वर्षानंतर आपल्या भाषेचे काय होणार याचा विचार आतापासूनच करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. कोंकणी साहित्य हिंदीमध्ये गेल्यामुळे आता ते राष्ट्रीय प्रवाहाशी जोडले गेले आहे असे ते म्हणाले. लोकांमध्ये भाषा शिकणे व शिकवण्याची ईच्छा नसेल तर भाषा पुढे जाणार नाही असे ते म्हणाले. हिंदी ही देशाला जोडणारी भाषा आहे असे ते म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास सर्वाना माहित आहे. पण याचवेळी गोव्याच्या स्वातंत्र्याचा संग्राम लोकांच्या ध्यानीमनी सुद्धा नाही आहे. याचे कारण हा इतिहास इतर भाषांमध्ये लिहिलाच गेला नाही आहे. म्हणूनच तो सर्वाना माहित होण्यासाठी हे लेखन विविध भाषांमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. असे मिश्रा यांनी सांगितले.
ऍड. खलप यांनी बोलताना राज्यात कोंकणी- मराठी हा संघर्ष गेली अनेक वर्षे सुरु असल्याचे सांगितले. पण प्रत्येक भाषेचे महत्व तितकेच आहे असेही त्यांनी नमूद केले. लोक आता इंग्रजी भाषेच्या प्रभावाखाली आपल्या मूळ भाषेकडे दुर्लक्ष करू लागले आहेत असे ते म्हणाले. सध्या राज्यात कोंकणी, मराठी, हिंदी व इंग्रजी अगदी काही ठिकाणी कन्नड भाषादेखील बोलली जाते. त्यामुळे एका गोवेकराला यातील किमान चार भाषा अवगत असतात. अशाप्रकारे भाषेचे खतखते झाले आहे. विविध भागांतील कोंकणी भाषाही विविध प्रकारची आहे. हेसुद्धा एकप्रकारचे खतखतेच आहे. असे ऍड. खलप यांनी सांगितले.
आपल्या स्वागत प्रास्ताविकात ज्योती कुंकळयेकर यांनी मावजो व खलप हे राज्यातील भाई आहेत. दोघांचाही राजकारण व समाजकारणाशी खूप जवळचा संबंध आहे असे सांगितले. अनुवादाचे महत्व त्यांनी काही उदाहरणांसहित स्पष्ट केले. या पुस्तकाच्या निमित्ताने हिंदीत कोंकणी मधील महत्वाच्या कथांचा अनुवाद होतो आहे. हि अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या.
संपादिका व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मूळ कोंकणी लेखक मीना काकोडकर, देविदास कदम, गजानन जोग, वसंत सावंत, माया खरंगटे, प्रकाश पर्येकर, महाबळेश्वर सैल, चंद्रकांत केणी, ज्योती कुंकळयेकर, ऑलिव्हीन गॉमिश, पुंडलिक नायक, शीला कोळंबकार, गोकुलदास प्रभू, डॉ. जयंती नायक, जयमाला दणायत आदीच्या कथा या पुस्तकात अनुवादित करण्यात आल्या आहेत. डॉ. रूपा च्यारी, डॉ. वृषाली मांदेकर, डॉ. शोभा वेरेकर, डॉ. आशा गहलोत, डॉ. अमृता डिंगे, डॉ. रमिता गुरव, डॉ. किरण पोपकर, उमा प्रियोळकर आदींनी या कथांचा अनुवाद केला आहे.
कार्यक्रमात उपस्थित लेखक व अनुवादकांचा यावेळी पुस्तकाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. संपदा कुंकळयेकर यांनी आभार मानले. डॉ रूपा च्यारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाशन समारंभास राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.